<p><strong>संगमनेर |प्रतिनिधी| Sangmner</strong></p><p>केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याने शेतीमालाचे भाव वाढून शेतकर्यांना फायदा न होता भांडवलदार व व्यापारी यांना फायदा झाला. कृषीप्रधान भारतात केंद्र सरकार शेतकर्यांचे हाल करत असून हे दुर्दैवी आहे.</p>.<p>महाराष्ट्रात सहकार चळवळीतून ग्रामीण विकास झाला असून सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी उभे केलेले सहकाराचे मॉडेल हे छत्तीसगडसह देशातील सर्व राज्यांसाठी उपयुक्त ठरेल, असे गौरवोद्गार छत्तीसगडचे मुख्यमंत्री नामदार भूपेश बघेल यांनी काढले.</p><p>मालपाणी लॉन्स येथे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व हरितक्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती महोत्सवानिमित्त आयोजित पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदामंत्री नामदार जयंत पाटील हे होते तर व्यासपीठावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आ. डॉ. सुधीर तांबे, आ. लहू कानडे, आ. डॉ. किरण लहामटे, माजी आमदार नरेंद्र घुले, छत्तीसगडचे विजय भाटीया, प्रदीप शर्मा, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे, महानंदाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख, बाजीराव खेमनर, सौ. दुर्गाताई तांबे, उद्योगपती राजेश मालपाणी, सचिन गुजर, करण ससाणे, डॉ. राजीव शिंदे, बाबासाहेब ओहोळ, लक्ष्मणराव कुटे, विजय बोराडे, उत्कर्षाताई रूपवते, इंद्रजित थोरात प्राचार्य केशवराव जाधव, प्रा. बाबा खरात, सेवा दलाचे विलास औताडे आदी उपस्थित होते.</p><p>याप्रसंगी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्काराने ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांना तर हरितक्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे पुरस्काराने ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते रणजित डिसले यांना आणि सहकारातील कार्यकर्ता या पुरस्काराने अॅड. माधवराव कानवडे यांना गौरवण्यात आले. 1 लाख रुपये व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. </p><p>नामदार बघेल म्हणाले, महाराष्ट्र ही स्वतंत्रता आंदोलनाची भूमी असून या राज्याने देशाला विचार दिले आहेत. सहकार चळवळ ही येथील विकासाचा गाभा आहे. संगमनेरचा सहकार हा मॉडेल व सर्वांसाठी उपयुक्त आहे हा प्रयोग छत्तीसगडमध्ये आपण राबवणार असून देशाला ही मार्गदर्शक ठरणार आहे. देशात सध्या शेतकरी व कामगार विरोधी धोरण राबवले जात असून दिल्लीच्या वेशीवर चाळीस दिवस शेतकरी आंदोलन करतात.</p><p>मात्र केंद्र सरकार त्यांच्याकडे परस्पर जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे हे अत्यंत दुर्दैवी आहे. खरे तर केंद्र सरकारने छत्तीसगड सरकारचे मॉडेल राबवले पाहिजे. खासदार राहुल गांधी यांनी दिलेली न्याय योजना अत्यंत प्रभावीपणे राबवली गेल्याने या राज्यात विकासाला गती मिळाली असल्याचेही ते म्हटले असून राज्यात नामदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष दमदार वाटचाल करत असून आगामी काळात संगमनेर व परिसरासाठी वैभवाचे दिवस राहणार असल्याचे ते म्हणाले. </p><p>ना. जयंत पाटील म्हणाले, स्व. भाऊसाहेब थोरात हे नेहमीच पाण्याबाबत आग्रही राहिले. निळवंडे धरणाबाबत स्व. भाऊसाहेब थोरात यांनी ज्या पद्धतीचे धोरण घेतले त्याच पद्धतीचे धोरण बाळासाहेब थोरात यांनी घेतले आहे, येत्या 2023-24 पर्यंत कालव्यांची कामे पूर्ण करून पाणी देणारच आहोत. पाण्याचे दुर्भिक्ष्य कमी करणे हेच महाविकास आघाडी सरकारचा मुख्य उद्देश आहे.</p><p>यासाठी नाशिक-नगर जिल्ह्यातील वळण बंधार्याचे कामांना गती देण्याचे काम प्रामुख्याने हाती घेण्यात आले आहे. हे सर्व पाणी गोदावरी खोर्यात येणार आहे. त्यामुळे पाण्याची टंचाई दुर होणार आहे. जलसंपदा खात्याने विविध योजना आखल्या आहेत. या सर्व योजनांना हात घातलेला आहे. गोेदावरी खोर्यात नदीचे पाणी आले पाहिजे म्हणून नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कामे सुरु झालेले आहे. त्यामुळे यापुढील काळात मोठ्या प्रमाणावर पाण्याची उपल्बधता होईल, अशी मला खात्री आहे.</p><p>बाळासाहेब थोरात सर्वांना बरोबर घेऊन चालणारे नेते आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली या विभागाचा विकास झाला असून सहकार बरोबर शैक्षणिक व प्रगतीमध्ये हा संगमनेर तालुका अग्रेसर ठरला आहे. राज्यातही नामदार बाळासाहेब थोरात यांचे अत्यंत महत्त्वाची भूमिका असून त्यांच्या सहकार्यामुळेच महाविकास आघाडी सरकार आले आहे. शेततळ्यातून झालेली जलक्रांती किंवा कोणत्याही योजना कशा प्रभावीपणे राबविणे हे नामदार बाळासाहेब थोरात यांच्याकडून शिकावे, असेही ते म्हणाले.</p><p>ना. बाळासाहेब थोरात म्हणाले, नामदार बघेल यांनी भाजपला धडा शिकवत मोठा दैदिप्यमान विजय मिळवून छत्तीसगडमध्ये काँग्रेस सत्तेवर आणले. त्याच्या पाठोपाठ महाराष्ट्रात राष्ट्रवादी शिवसेना आणि काँग्रेसचे महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. यामध्ये जयंत पाटील यांचाही मोठा वाटा राहिला खरे तर महाराष्ट्रात स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, डॉ. अण्णासाहेब शिंदे, तीर्थरुप भाऊसाहेब थोरात यांनी घातलेल्या पायामुळे व केलेल्या कामामुळे आज आपण आनंदी जीवन जगत आहोत. </p><p>हाच वारसा आपल्याला पुढे चालवायचा आहे अडचणीच्या काळात संजय आवटे आणि पुरोगामी विचार कायम जोपासला असून रणजितसिंह डिसले यांनी प्राथमिक शिक्षकांना ग्लोबल चेहरा मिळवून दिला आहे. तर सहकारातील माधवराव कानवडे महत्त्वाचे कार्यकर्ते असून त्यांच्या कार्यकाळात झालेल्या नवा कारखाना निर्मितीचा निर्णय अत्यंत ऐतिहासिक ठरला आहे. देशात शेतकर्यांचे राज्य पाहिजे मात्र भाजप हे शेतकर्यांना वेठीस धरून भांडवलदारांसाठी कायदे करू पाहतायं यासाठी आपण प्रत्येकाने आवाज उठवला पाहिजे असे ते म्हणाले.</p><p>संजय आवटे, रणजितसिंह डिसले, अॅड. माधवराव कानवडे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी शंकरराव खेमनर, आबासाहेब थोरात, दिलीपराव शिंदे, अमित पंडीत, रामदास वाघ, सौ. मिराताई शेटे, सुनंदाताई जोर्वेकर, नवनाथ अरगडे, संपतराव डोंगरे, रामहरी कातोरे, विश्वासराव मुर्तडक, जगन्नाथ घुगरकर, भास्कर पानसरे उपस्थित होते.</p><p>प्रास्ताविक आ. डॉ. सुधीर तांबे यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर थोरात कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ यांनी आभार मानले. यावेळी राज्य, जिल्हा व तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. </p>.<p><strong>ना. थोरात यांचा फोन म्हणजे निळवंडेचे काम</strong></p><p><em>जयंत पाटील म्हणाले, कोणत्याही कामानिमित्त महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा फोन आला की मला पहिले निळवंडे धरणाचे काहीतरी काम असणार आहे. मी इतरांकडून खात्री करून घेतो आणि मग थोरात साहेबांशी बोलतो. निळवंडे कालवे पूर्ण करून सर्वसामान्य जनतेला पाणी देणे हा त्यांच्या जीवनाचा ध्यास असल्याचे नामदार पाटील यांनी यावेळी सांगितले.</em></p>