अकोले | प्रतिनिधी
निळवंडे धरणातून आज (शनिवारी) सकाळी 6 वाजता पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडण्यात आले आहे. या आवर्तनात साधारण अर्धा टीएमसी पाण्याचा वापर होण्याची शक्यता आहे.
पाऊस थांबून बरेच दिवस झाले सध्या प्रवरा नदीचे पात्र अनेक ठिकाणी कोरडे पडले असून नदी काठच्या अनेक गावांना पाणी टंचाई जाणवत आहे. मागील काही दिवसांपासून अकोले शहराला दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे.
लाभ क्षेत्रातील पिण्याच्या पाण्याची टंचाई लक्षात घेऊन पिण्याच्या पाण्यासाठी हे आवर्तन सोडण्यात आले आहे. आज सकाळी निळवंडे धरणातून 1300 क्यूसेक विसर्ग प्रवरा नदीत सोडण्यात आले आहे.
निळवंडे आणि भंडारदरा ही दोन्ही धरणे सध्या काठोकाठ भरलेली आहेत. भंडारदरा धरणात 11039 दलघफु तर निळवंडे धरणात 8328 दलघफु पाणी साठा असल्याची माहिती भंडारदऱ्याचे शाखा अभियंता अभिजीत देशमुख यांनी दिली. हे आवर्तन सुमारे 5 दिवस सुरू राहील व त्यात साधारण 500 दलघफु पाणी वापर होण्याची शक्यता आहे.