तज्ज्ञांची मदत घेवून नरभक्षक बिबट्या जेरबंद करा

आ. मोनिका राजळे यांची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी
तज्ज्ञांची मदत घेवून नरभक्षक बिबट्या जेरबंद करा

अहमदनगर (प्रतिनिधी) -

पाथर्डी तालुक्यात नरभक्षक बिबट्यामुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. मागील काही दिवसांत बिबट्याच्या हल्ल्यात 3 मुलांचा बळी

गेला आहे. यापार्श्वभूमीवर नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी तातडीने कार्यवाही करून तालुक्यातील मृत्युचे सत्र थांबविण्याची मागणी आ.मोनिका राजळे यांनी केली आहे.

आ.राजळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांची भेट घेवून याबाबतचे निवेदन दिले. यावेळी पंचायत समिती सभापती गोकुळ दौंड, जि.प.सदस्य राहुल राजळे, पुरुषोत्तम आठरे, विष्णूपंत अकोलकर, सुनिल ओहोळ, सुनिल परदेशी, काकासाहेब शिंदे, एकनाथ आटकर, सुभाष केकाणए शिवाजी मोहिते आदी उपस्थित होते.

तालुक्यातील मौजे केळवंडी, मढी, कासार पिंपळगाव, शिरापूर बुधवंत वस्ती या भागात बिबट्याने हल्ला केल्याचे प्रकार घडले आहेत. कासार पिंपळगाव, जवखेडे, तिसगाव, धामणगांव, रांजणी, केळवंडी, माणिक दौंडी , वृध्देश्वर डोंगर परिसर, मायंबा डोंगर परिसर या परिसरातही बिबट्याने शेतकर्यांकडील अनेक पाळीव जनावरे फस्त केली आहेत. बिबट्या नरभक्षक बनल्याने नागरिकांमध्ये भितीचे व घबराटीचे वातावरण आहे. वन विभाग व प्रशासनाकडून फक्त आश्वासने दिली जात आहे. त्यामुळे नागरिकांच्या संतापाला व रोषाला आवरणे कठीण बनले आहे. वन विभागाने जुजबी उपाययोजना न करता नरभक्षक बिबट्याला शोधून जेरबंद करावे किंवा त्याला ठार मारावे यासाठी अनुभवी अधिकारी, तज्ज्ञ यांची मदत घ्यावी. अन्यथा नागरिकांच्या संतापास आवर घालणे कठीण होणार असल्याचे आ.राजळे यांनी निवेदनात म्हटले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com