
नेवासा |शहर प्रतिनिधी| Newasa
नेवासा तालुक्यातील दोन वर्षापुर्वी बोगस सोयाबिन बियाणे दिल्याने शेतकर्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून याबाबत संबंधित कंपनी विरोधात शेतकर्यांनी एक वर्षापुर्वी तालुका कृषी अधिकार्यांना निवेदन देवूनही दखल न घेतल्यामुळे कृषी अधिकारी कार्यालयासमोर प्रहार जनशक्ती पक्षाचे युवा अध्यक्ष विकास कोतकर व सरपंच बाबासाहेब कोतकर यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात आले.
तालुक्यातील सन 2020 च्या हंगामात शेतकर्यांना बोगस सोयाबीन बियाणे दिल्याने शेतकर्यांचे लाखोंचे नुकसान झाले. शेतकर्यांनी कंपनी विरोधात तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रारी केल्या परंतु एक ते दीड वर्ष होवूनही दखल घेतली जात नसल्यामुळे कृषी खाते या कंपनीला अभय तर देत नाही ना? असा सवाल करण्यात आला.
या विरोधात प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने बेमुदत आंदोलन पुकारण्यात आले आहे. आंदोलनात जनशक्ती पक्षाचे युवा तालुकाध्यक्ष विकास कोतकर, सरपंच बाबासाहेब कोतकर जिल्हा कायदेशीर सल्लागार पांडुरंग औताडे, तालुका कार्याध्यक्ष अनिल विधाटे, तालुका संघटक आदिनाथ नवले, महेश मते, शाखा अध्यक्ष पांडुरंग नवले, गोरक्षनाथ टेकणे, नानासाहेब कोतकर, बापूसाहेब टेकणे, बंडू कोतकर सहभागी झाले आहेत. आंदोलनास त्रिंबक भदगले, गोरक्षनाथ साळुंखे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला तालुकाध्यक्षा मिराताई गुंजाळ, मुक्ताबाई साळुंखे यांनी पाठिंबा दिला आहे.