अहमदनगर (प्रतिनिधी) -
ठाकरे सरकारमधील मंत्री संजय राठोड यांच्या फोटोला दिल्लीगेट चौकात जोडे मारत नगर शहर महिला भाजपने रस्तारोको
केला. भक्कम पुरावे असतानाही मंत्री राठोड विरोधात कारवाई न होता, त्यांना सरकारकडून अभय दिला जात असल्याचा आरोप महिला शहरजिल्हाध्यक्ष अंजली वल्लाकट्टी यांनी यावेळी केला.
प्रदेश सरचिटणीस सुरेखा विद्ये, प्रिया जानवे, कॅन्टोन्मेंट सदस्या साठे, नम्रता सगम, सविता सामल, अर्चना चौधरी, संध्या पावसे, ललिता कोटा, अश्विनी करांडे यावेळी उपस्थित होत्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय नियमांचे पालन करीत हे आंदोलन करण्यात आले.
पुजा चव्हाण तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे भक्कम पुरावे मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात असतानाही त्यांच्यावर कोणतीही कारवाई अद्यापपर्यंत झालेली नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अद्याप त्यांचा राजीनामा न घेता या प्रकरणाकडे डोळेझाक करीत आहेत. अत्याचारित कुंटुंबावर मंत्री राठोड दादागिरी करीत दबाव टाकत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. त्यामुळे कुटुंबही घाबरलेले आहे. महाआघाडी सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यात महिला असुरक्षित असल्याचा आरोप अंजली वल्लाकट्टी यांनी केला.
राज्यातील आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळातील तीन मंत्र्यांनी महिलांवर अत्याचार केल्याचे आरोप आहेत. नागरिकांची कामे करणे, त्यांना सोयीसुविधा पुरविणे ही कामे करण्यापेक्षा सरकारमधील मंत्र्यांमध्ये महिलांवर अत्याचार करण्याची चढाओढ सुरू असल्याचे वल्लाकट्टी म्हणाल्या. नव्यानेच उघड झालेले मंत्री संजय राठोड यांचे प्रकरण भयानक आहे. मत्री राठोड यांचा राजीनामा घेवून या प्रकरणाची सत्यता समोर आणावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
सुरेखा विद्ये म्हणाल्या की, तिघाडीमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे हात दबलेले असल्याने ते सक्षम निर्णय घेताना दिसत नाहीत. अत्याचार करणार्या मंत्र्यांना ते पाठीशी घालत आहेत. मंत्री संजय राठोड यांचा तत्काळ राजीनामा घेतला नाही, तर भाजपा महिला आघाडी शांत न बसता अधिक तीव्र आंदोलन करतील, असे विद्ये यांनी सांगितले.