अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
नरेंद्र मोदी यांच्या सारख्या सक्षम व्यक्तीने देशाच्या पंतप्रधानपदाची धुरा हातात घेतल्यापासून देशात विकासाचे वारे वाहू लागले आहेत. जे 70 वर्षात झाले नाही ते अवघ्या 8 वर्षांत नरेंद्र मोदींनी करून दाखवले आहे. राज्यामध्ये झालेल्या परिवर्तनानंतर शिंदे-फडणवीस सरकारने महिला सुरक्षिततेचा विषय अजेंड्यावर घेतल्याने महिलांबाबतीत खूप मोठे व महत्वाचे निर्णय घेतले आहे. भाजपच्या महिला पदाधिकारी ज्या पिडीत, अन्यायग्रस्त महिला आहेत त्यांना आधार देत आहेत, असे प्रतिपादन भाजपा महिला आघाडीचा प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केले.
भाजपा महिला आघाडीचा प्रदेशाध्यक्षा वाघ शनिवारी नगर शहर दौर्यावर आल्या होत्या. शहरात त्यांनी विविध संघटना, सामाजिक संस्थांना भेटी दिल्या. शहर महिला आघाडीच्या वतीने अशोकभाऊ इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आयोजित महिला सक्षमीकरण व जागृती मेळाव्यात त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, महिला आघाडी अध्यक्षा अंजली वल्लाकटी, प्रदेश सदस्या गीता गिल्डा, जिल्हाध्यक्षा अश्विनी थोरात, माजी उपमहापौर गीतांजली काळे, अकोल्याच्या नगराध्यक्षा सोनाली नाईकवाडी, महिला बालकल्याण सभापती लता शेळके, ओबीसी महिला आघाडी अध्यक्षा रेखा विधाते, स्वाती पवळे, शुभांगी साठे, सोनाली चितळे आदींसह पदाधिकारी, महिला व शाळेतील विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
वाघ म्हणाल्या, युवक युवतींना संविधाने व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे. पण या स्वातंत्र्यचा स्वैराचार करू नका. आई वडील इतकं प्रेम जगामध्ये कोणीच करत नाही. या वयात मुलींना खूप प्रलोभने येतात. हे प्रलोभने भुलभुलैय्या आहेत. आता प्रत्येकाकडे इंटरनेट आहे. सोशल मिडिया सारखे जग जवळ आणणारे माध्यम तुमच्याकडे आहे. त्याचा योग्यच वापर करा. त्याच्या दुरुपयोगामुळे एक श्रद्धा वालकर बळी पडली आहे. त्यामुळे आईवडिलांनी लक्ष द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.