
भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara
गत आठ दिवसांपासून सुरू असलेला पावसाचा जोर ओसरला आहे. असे असलेतरी डोंगरदर्यातून अजूनही पाणी येत असल्याने भंडारदरा धरणातील पाणीसाठा 79 टक्क्यांवर पोहचला आहे. 11039 दलघफू क्षमतेच्या या धरणात काल सायंकाळी पाणीसाठा 82720 दलघफू झाला होता. आज 80 टक्के होण्याची शक्यता आहे. दरम्यान, धरणातील मुबलक पाणीसाठा लक्षात घेता प्रशासनाने साठा नियंत्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पाऊस वाढल्यास पाणी प्रवरा नदीपात्रात सोडण्यात येणार आहे.
निळवंडे धरणातील पाणीसाठा 6214 (74.71) दलघफू झाला होता. या धरणातून प्रवरोा नदीत 2300 क्यसेकने पाणी सोडण्यात येत होते. ते घटविण्यात येऊन 800 क्युसेक करण्यात आले. ओझर ओव्हरफ्लो 2997 क्युसेकने सुरू आहे.
भंडारदरा धरण परिसरात पाऊस मध्यम स्वरुपात पडत आहे. धरणाचा साठा गतवर्षी जास्त होता तर गेल्यावर्षी कॅनॉल परिसरात दर महिन्यात 3 ते 4 वेळा पाऊस झाल्यामुळे शेतीसाठी आवर्तनाच्या पाण्याची अवश्यकता वाटली नाही त्यामुळे धरणात पाणी साठा शिल्लक राहिला.त्यामुळे गतवर्षी साठा जास्त दिसत आहे.तसेच यावर्षी साठा 2365द.ल.घ.फु. शिल्लक होता.धरण दर वर्षी भरते व यावर्षीही येत्या काही दिवसांत धरण ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे.
जलसंपदा विभागाचे सहाय्यक अभियंता श्रेणी-1चे जोरवेकर, सहाय्यक अभियंता श्रेणी-2चे अभिजीत देशमुख, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक तेजेस शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा कार्याल्यातील बिनतारी यंत्र चालक प्रकाश चव्हाण, मुकादम वसंत भालेराव,गेजवाहक मंगळीराम मधे, व्हॉल्व्ह द्वार चालक पांडुरंग झडे, अन्तु सगभोर, चंद्रकांत भगत, सुरेश हबीर, प्रकाश उघडे धरण पाणीपातळी व पर्जन्य मापन यावर लक्ष ठेवून आहेत.
भोजापूर तुडूंब, म्हाळुंगी नदीला पाणी
361 दलघफू क्षमतेचे भोजापूर धरण काल पहाटे ओव्हरफ्लो झाल्याने म्हाळुंगी नदीत सुमारे 540 क्युसेकने पाणी प्रवाह सुरू आहे. या नदीचे पाणी काल सायंकाळी 6 वाजता सिन्नर तालुक्यातील नळवाडी गावाच्या पुढे निघाले होते. ही नदी संगमनेर तालुक्यातून वाहते. ही नदी संगमनेरात प्रवरा नदीला मिसळते. या नदीकाठच्या संगमनेरातील जनतेने खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.