अहमदनगर (प्रतिनिधी) / Ahmednagar - महापालिकेने शहरातील अतिक्रमणावर कारवाईला सुरूवात केली आहे. अतिक्रमण विभागप्रमुख कल्याण बल्लाळ, प्रभाग अधिकारी दिनेश सिनारे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी वाडियापार्क येथून कारवाई सुरू झाली. वाडियापार्क परिसरात रस्त्यावर आलेले फळविक्रेते, हातगाडी व्यावसायिकांना हटविण्यात आले.
त्यानंतर माळीवाडा वेस परिसरात कारवाई करण्यात आली. आशा टॉकीज चौक परिसरातील अतिक्रमण काढण्यात आले. दुसर्या पथकाकडून औरंगाबाद महामार्गावरील जुन्या आरटीओ समोरील पाण्याच्या टाकीच्या परिसरात बांधण्यात आलेले पत्र्याचे गाळे व इतर अतिक्रमणे हटविण्यात आली.
शहरात अनेक ठिकाणी परवानगी न घेता पत्र्यांचे गाळे, टपर्या उभारून व्यवसाय थाटण्यात आलेले आहेत. आयुक्त शंकर गोरे व उपायुक्त यशवंत डांगे यांच्या आदेशानुसार या अनधिकृत टपर्या व पत्रा मार्केटवर कारवाईचे नियोजन सुरू आहे. दरम्यान, शहरातील दीड हजार पत्र्यांचे गाळे मनपाच्या रडारवर असल्याचे सांगण्यात येत आहे.
मंगळवारी आशा टॉकीज चौक, वाडियापार्क, औरंगाबाद महामार्गावरील जुन्या आरटीओ समोरील अतिक्रमण काढण्यात आले. अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरूच राहणार असून शहरातील मोठ मोठी अतिक्रमणे काढण्यात येणार आहेत.
- यशवंत डांगे (उपायुक्त, महापालिका)