मुंबई |प्रतिनिधी| Mumbai
राज्यातील सर्व जिल्ह्यांत ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शनचं वाटप समान झाले पाहिजे, अशी अपेक्षा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली.
अहमदनगरला जाणारा ऑक्सिजनचा टँकर काल पुणे जिल्ह्यात थांबवण्यात आल्याचा प्रकार योग्य नव्हता, असे ते म्हणाले.
ना.थोरात म्हणाले, नगर जिल्ह्यात अनेक करोनाबाधित रुग्ण आहेत. ऑक्सिजनची गरज आहे, पण पुरवठा नाही. कालची रात्र भयानक होती. सगळीकडून फोन येत होते. नगरकडे येणारा ऑक्सिजनचा टँकर थांबवण्यात आला होता. तेव्हा हस्तक्षेप करावा लागला. मुख्य सचिवांशी बोललो. नगरकडे जाणारा टँकर थांबवू नका, अशा सूचना दिल्या.
त्यानंतर टँकर नगरकडे रवाना झाला. कमतरता आहे त्यामुळे ऑक्सिजनचं नियोजन केलं पाहिजे. प्रत्येकाला ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर मिळालं पाहिजे. त्यामुळे प्रत्येकाने काटकसरीने वापर करावा, असे आवाहनही त्यानी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केले.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्रात 15 दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन करण्याच्या निर्णयावर एकमत झाल आहे. मात्र दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंतिम पर्याय म्हणून लॉकडाऊनचा वापर करावा, अस सुचविलं. यावर बाळासाहेब थोरात म्हणाले, लॉकडाऊन हा पर्याय सगळ्या जगाने स्वीकारलेला आहे.
मागच्या वर्षी कोणालाही वेळ न देता हा पर्याय वापरला होता. त्यावेळी त्यांनी वेगळी भूमिका घेतली आणि आता ही भूमिका? गुजरात, भोपाळ, लखनौमध्ये परिस्थिती काय आहे? आकडे दाबून ठेवले तरी स्मशानभूमीतील आकडे सत्य दाखवतात, असेही ते म्हणाले.