अहमदनगर (प्रतिनिधी) -
केंद्र सरकारने 1 मार्चपासून 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना तसेच 45 वर्षावरील गंभीर रुग्णांना लस उपलब्ध करून देण्याचा निर्णय
घेतला आहे. मात्र, या लसीकरणासाठी अवघे तीन दिवस शिल्लक असताना आरोग्य विभागाच्या स्थानिक पातळीवर मात्र ही लस कशी देणार याबाबत कोणत्याही मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या नाहीत, त्यामुळे स्थानिक आरोग्य विभागात संभ्रमावस्था निर्माण झाली आहेत.
राज्यात करोनाचे रुग्ण सातत्याने वाढत असताना जिल्ह्यात देखील गुरुवारी 278 हून अधिक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे जिल्ह्यात करोनाचा धोका वाढला असून असे असतानाच बुधवारी केंद्र सरकारने 60 वर्षावरील वृद्धांना व 45 वर्षावरील गंभीर रुग्णांना करोनाची लस उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, लस कशी देणार याबाबत केंद्र सरकारकडून मार्गदर्शक सूचना आरोग्य विभागाला अद्याप प्राप्त झालेल्या नाहीत.
जिल्ह्यासाठी आतापर्यंत 1 लाख 5 हजार 310 लसीचा डोस प्राप्त झाले आहेत. जिल्हा शासकीय रुग्णालयासह ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र अशा 41 ठिकाणी लसीकरण सुरू आहे. आतापर्यंत 30 हजार 872 जणांना पहिला डोस देण्यात आला आहे. तर 2 हजार 712 जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात 55.35 टक्के लसीकरण झाले आहे तर दुसर्या टप्प्यात 5.1 टक्के लसीकरण झाले आहे. पहिल्या व दुसर्या टप्प्यातील लसीकरण पूर्ण झाले नसतानाच केंद्र सरकारने बुधवारी 1 मार्चपासून 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना तसेच 45 वर्षावरील गंभीर रुग्णांना लस उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी केवळ तीन दिवसाचा कालावधी असताना जिल्ह्याच्या आरोग्य विभागाकडे मात्र ही लस कशी देणार याबाबत कुठल्याच सूचना देण्यात आल्या नाहीत त्यामुळे आरोग्य विभाग देखील संभ्रमात आहे.
................
अद्याप सूचना नाहीत
लसीकरणाचे काम सुरू आहे. मात्र ज्येष्ठ नागरिक व गंभीर रुग्णांना लस देण्याबाबत अद्याप कोणत्याच सूचना आलेल्या नाहीत. एक दोन दिवसांत शासनाकडून याबाबत मार्गदर्शन येणे अपेक्षीत आहे. येणार्या मार्गदर्शनानूसार कार्यवाही करण्यात येईल.
डॉ. सुनील पोखर्णा, जिल्हा शल्यचिकित्सक.
.............
आणखी 278 करोनाग्रस्त वाढले
जिल्ह्यात करोना संसर्गाचा धोका वाढला आहे. गुरूवारी 278 जणांना करोना संसर्गाचे निदान झाले. करोना उपचारादरम्यान गुरूवारी दोन रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत जिल्ह्यात 1 हजार 134 जणांचा मृत्यू झाला आहे. गुरूवारी 168 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या जिल्ह्यात 1 हजार 6 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्हा रुग्णालयाच्या लॅबमध्ये 117, खाजगी प्रयोगशाळेत 127, तर अँटीजेन चाचणीत 34 रूग्ण बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयानुसार मनपा 35, अकोले 6, जामखेड 6, कर्जत 5, नगर ग्रामीण 9, पारनेर 8, पाथर्डी 2, राहाता 14, संगमनेर 20, श्रीरामपूर 10, मिलिटरी हॉस्पिटल 1, इतर जिल्हा 1 अशा रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेत मनपा 34, अकोले 2, कर्जत 3, कोपरगाव 6, नगर ग्रामीण 4, नेवासा 5, पारनेर 11, पाथर्डी 2, राहता 14, राहुरी 1, संगमनेर 33, श्रीगोंदा 5, श्रीरामपूर 4 आणि इतर जिल्हा 3 अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत मनपा 5, जामखेड 13, कर्जत 3, नगर ग्रामीण 2, पारनेर 4, पाथर्डी 1, राहाता 3, राहुरी 2, श्रीगोंदा 1 अशा रुग्णांचा समावेश आहे.
....................
पहिल्या टप्प्यात असे झाले लसीकरण
एकूण लसीकरण-30 हजार 872
आरोग्य विभाग-23 हजार 725
महसूल-1 हजार 11
पोलीस-2 हजार 642
पंचायत समिती स्तर-2 हजार 121
गृह व शहरी कामकाज-1 हजार 376
.................
चौकट
55 हजार 771 व्यक्तींची नाव नोंदणी
करोना लस घेण्यासाठी कोविन पवर आतापर्यंत 55 हजार 771 जणांची नोंदणी झाली होती. मात्र, त्यापैकी 30 हजार 872 जणांची लसीकरण झाले आहे. अद्यापही 25 हजार आरोग्य कर्मचारी पोलिस व महसूल कर्मचार्यांनी लस घेतलेली नाही.
.................