<p><strong>नेवासा lतालुका प्रतिनिधीl Newasa</strong></p><p>कोविड -19 मुळे मृत्यू झाल्यास राज्यातील साखर कामगारांच्या वारसाला किमान 5 लाख रुपयांची आर्थिक मदत मिळेल </p>.<p>यासाठी साखर कामगारांना सुद्धा विमा कवच मिळावे अशी मागणी राज्य साखर कामगार फेडरेशनचे अध्यक्ष अविनाश आदिक व सरचिटणीस नितीन पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थ मंत्री अजितदादा पवार यांचे कडे केली आहे.</p><p>श्री.आदिक यांचे नेतृत्वाखालील साखर कामगार फेडरशेनच्या शिष्टमंडळाने आज बुधवार दि.16 डिसेंबर रोजी दुपारी मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयात भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले.</p><p>निवेदनात म्हंटले आहे की,साखर उद्योग हा देशातील क्रमांक 2 चा कृषीमाल प्रक्रिया उद्योग आहे.साखर कामगार हा या उद्योगातील अत्यंत महत्वाचा आणि अविभाज्य घटक आहे. सध्या असलेले तुटपुंजे वेतन व थकीत पगार यामुळे राज्यातील साखर कामगार मेटाकुटीस आलेला आहे. त्यातच देशात व आपले राज्यात कोविड -19 या महामारीने थैमान घातलेले आहे. अनेक साखर कामगार या महामारीचे बळी ठरत आहेत.कोविड -19 संसर्ग आजारामुळे मृत्यू पावलेल्या कामगारांना विमा कवच देणे अत्यंत गरजेचे आहे .</p><p>राज्यात पोलीस, आरोग्य व ग्रामविकास विभागातील कर्मचा-यांना देण्यात आलेल्या “ 50 लाखाचे विमा कवच "योजनेच्या धर्तीवर राज्यातील साखर उद्योगातील कामगारांचा कोविड -19 मुळे मृत्यू झाल्यास त्यांचे वारसांना किमान 5 लाख रूपये मदत मिळावी यासाठी " साखर कामगार विमा कवच " योजना राज्य शासन व साखर संघ यांचेमार्फत राबविणेत यावी.</p><p>यावेळी साखर कामगार फेडरशेनचे खजिनदार डी. एम.निमसे,संपर्क प्रमुख सुखदेव फुलारी, नेवासा तालुका साखर कामगार संघाचे अध्यक्ष अशोकराव पवार आदी उपस्थित होते.</p>