अहमदनगर (प्रतिनिधी) -
माथाडी पतसंस्थांचे कर्ज, हफ्ते कपाती बाबत चर्चा होऊन या संदर्भातील आदेशावर स्वाक्षरी करून संबंधितांनी लवकरात लवकर आदेश
माथाडी कामगार मंडळांना पारीत करण्याच्या सूचना ना. दिलीप वळसे पाटील यांनी दिल्या. राज्यातील माथाडी कामगारांचे विविध प्रश्नावर राज्य हमाल मापाडी महामंडळाच्या पदाधिकार्यांनी ना. वळसे पाटील यांची मुंबई येथे समक्ष भेट घेऊन चर्चा केली. यावेळी महामंडळाचे सहचिटणीस तथा जिल्हा हमाल पंचायत अध्यक्ष अविनाश घुले आदी उपस्थित होते.
माथाडी कामगारांबाबत फडणवीस सरकारने मागील पाच वर्षामध्ये आडमुठेपणाचे निर्णय घेऊन कष्टकरी जनतेचा छळ करण्याचे पाप केले आहे. मार्च 2019 मध्ये लोकसभेची आचारसंहिता लागू होण्याअगोदर शासन निर्णय होऊन माथाडी कामगारांच्या पगारातून माथाडी पतसंस्था, बँका यांचे कर्ज हफ्ते कपात करण्याचे बंद केले. या निर्णयामुळे माथाडी कामगार आर्थिक अडचणीमध्ये आला व परिणामी खाजगी सावकारांच्याकडे जाण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नव्हता. फडणवीस सरकार भांडवलदारांच्या पाठीमागे कशा प्रकारे भक्कम उभे होते. याचे हे ज्वलंत उदाहरण आहे. परंतु शेतकरी, शेतमजूर,कष्टकरी जनता यांचेशी नाळ असणारे आघाडी सरकार खा. शरदचंद्र पवार यांचे मार्गदर्शनाखाली स्थापन झाल्यानंतर खा.शरदचंद्र पवार यांनी पुण्यात डॉ.बाबा आढाव यांची समक्ष भेट घेऊन माथाडी कामगारांच्या प्रश्नाबाबत संबंधित खात्यांचे मंत्री व अधिकारी यांची बैठक घेऊन माथाडी कामगारांचे प्रलंबित असलेल्या प्रश्नांबाबत सकारात्मक निर्णय घेतल्यामुळे राज्यातील माथाडी कामगार सुखावला आहे.
राज्य माथाडी सल्लागार मंडळांची नियुक्ती करण्यात यावी. स्थानिक माथाडी मंडळावर स्थानिक हमाल मापाडी प्रतीनिधी नियुक्त करण्यात यावेत. शासकीय धान्य गोदामातील मजुरीमधून टी.डी.एस कपात करण्यात येऊ नये. राज्यातील माथाडी मंडळांना जी.एस.टी टॅक्समधून वगळण्याबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात यावा इत्यादी प्रश्नांबाबत उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांना निवेदन दिलेले असल्याचे अविनाश घुले यांनी सांगून खा. शरद पवार, मुख्यमंत्री ना.उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री ना. अजित पवार, कामगार मंत्री ना. वळसे पाटील यांचे कष्टकरी माथाडी कामगार व राज्य हमाल मापाडी महामंडळाच्यावतीने आभार मानले आहेत.