आश्वी |वार्ताहर| Ashwi
संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे जमिनीच्या वादामुळे येथील दिनकर यादव वर्पे यांनी राहत्या घरात गळफास घेऊन
आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याबाबत आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानतंर पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेतले आहे.
याबाबत दिनकर वर्पे यांचा मुलगा मुकेश वर्पे याने दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आमच्या घराच्या पश्चिमेला चुलते माधव उर्फ गोरख वर्पे यांची 15 गुंठे जमीन व घर आहे. त्या ठिकाणी ते एकटेच राहत होते.
त्यांची पत्नी व मुले ममदापूर (ता. राहाता) या ठिकाणी राहत होते. गट नं जी 2/2 ही जमीन चुलते यांनी 2017 मध्ये विक्रीस काढल्यानतंर वडिलानी आईच्या नावे खरेदी घेतली होती. त्यानतंर 2019 मध्ये माझे चुलते मयत झाले.
आम्ही चुलत्याची जमिन विकत घेतल्यामुळे ऑगस्ट मध्ये आतेभाऊ दादासाहेब उर्फ पप्पू तांबे, चुलतभाऊ ऋषिकेश वर्पे, आतेबहिण राणी तांबे, मामा भानुदास तांबे व आत्या अलका तांबे (सर्व रा. चिचंपूर, ता. संगमनेर) यांनी वडीलांना जमीन खरेदी केल्यामुळे शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली होती.
तर मागील 15 दिवसापासून माझी चुलती चद्रंकला वर्पे ही चुलत आजी नंदाबाई वर्पे (रा. आश्वी बुद्रुक) व दादासाहेब तांबे (रा. चिचंपूर) यांच्या घरी राहत होती. आठ दिवसापूर्वी माझे वडील दुकानात असताना आतेभाऊ दादासाहेब उर्फ पप्पू तांबे तेथे आला व त्याने इतरांच्या काय नादी लागतोस माझ्या नादी लाग तुला भोसकून टाकतो, असा दम दिला होता.
दि. 18 ऑक्टोबर 2020 रोजी दुपारी चुलतभाऊ ऋषिकेश वर्पे, आशुतोष वर्पे, चुलती चद्रंकला वर्पे व एक अनोळखी मुलगा आले व आमची अडीच गुंठे जमिन काढून द्या असे म्हणाले. त्यावेळी वडिलांनी आम्ही जमीन विकत घेतल्याचे सागंत तुमची येथे जमीन नसल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांनी एक-एकाचे मुडदे पाडू, अशी दमबाजी करुन आम्ही विकत घेतलेल्या जमीनीत पोल रोवले.
पोल रोवण्यासाठी दत्तात्रय वर्पे, नंदाबाई वर्पे यांनी त्यांना मदत केली. यावेळी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास चुलतभाऊ ऋषिकेश वर्पे व आशुतोष वर्पे यांनी वडीलांना मारहाण करत उद्या या जागेवर शेड ठोकतो तु काय करतो, असे म्हणत दम दिला. त्यामुळे वडीलांनी आश्वी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
19 ऑक्टोबर 2020 रोजी सकाळी आम्ही चारा काढण्यासाठी शेतात गेलो असता वडील घरी ऐकटे होते. चारा घेऊन आई घरी आल्यानंतर मोठ्याने ओरडली त्यामुळे जाऊन पाहिले असता वडील दोरीच्या साहयाने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यामुळे शेजारील लोकांच्या मदतीने वडीलांना खाली घेऊन आश्वी पोलीसाना याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला असता यावेळी वडीलांच्या खिशात दोन चिठ्ठ्या सापडल्या.
त्यातील एका चिठ्ठीत चुलतभाऊ ऋषिकेश वर्पे, आशुतोष वर्पे व चुलती चद्रंकला वर्पे यांच्या मानसिक त्रासाला कटांळून तर दुसर्या चिठ्ठीत दादासाहेब उर्फ पप्पू तांबे, भानुदास तांबे, अलका तांबे, भिमाजी तांबे, सचिन तांबे, राणी तांबे यांच्या मानसिक छळाला कटांळून आत्महत्या करत असल्याचे लिहून ठेवले होते.
त्यामुळे या 9 जणांविरुध्द आश्वी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नबंर 422/2020 नुसार भारतीय दंड संहिता कलम 306, 504, 506 व 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असून पोलिसांनी 7 जणांना ताब्यात घेतल्याची माहिती दिली आहे.