<p><strong>आश्वी |वार्ताहर| Ashwi</strong></p><p>संगमनेर तालुक्यातील आश्वी पंचक्रोशीतील गावांमध्ये मागील तीन ते चार महिन्यांपासून बिबट्या पाठोपाठ विषारी नागासह </p>.<p>इतर विषारी संर्प व हिंस्र प्राण्याची संख्या वाढल्याने मोठी दहशत निर्माण झाली आहे. अद्याप कोणीही या प्राण्यांच्या हल्ल्यांना बळी पडले नसले तरी वारंवार होणार्या दर्शनामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.</p><p>आश्वी खुर्द येथील डॉ. प्रणव गुणे यांच्या घरी दोन दिवसांपूर्वी इंडियन ब्लॅक कोब्रा या अति विषारी नागाने भक्षाच्या शोधात हजेरी लावली होती. या कुटुंबाने या विषारी नागाला मारण्याऐवजी येथील सर्पमित्र शिवा पवार याला फोनवरून याबाबत माहिती दिली. क्षणाचाही विलंब न करता सर्पमित्र शिवा पवार याने डॉ. गुणे यांच्या घरी धाव घेऊन मोठ्या शिताफीने या विषारी नागाला बंदिस्त करून लांब निसर्गात मुक्त केले.</p><p>दैनंदिन परिसरातील वेगवेगळ्या गावांमध्ये लहान मोठ्या सर्पांबरोबरच इतर विषारी सर्प आढळून येत असून यामुळे अद्याप कोणतीही मोठी दुर्घटना झाली नसली तरी या विषारी प्राण्याच्या दर्शनाने धडकी भरत असल्याने नागरिक दहशतीखाली वावरत आहेत. </p><p>तर मागील काही दिवसांपासून बिबट्याचे हल्ले कमी झाल्यामुळे दिलासा मिळालेल्या शेडगाव, हंगेवाडी, पानोडी, शिबलापूर व माळेवाडी परिसरातील 12 ते 15 नागरिकांना मागील आठवड्यात सरसाने हल्ला करून जखमी केल्याची घटना ताजी असताना वाढत चाललेल्या या विषारी नागाच्या अस्तित्वामुळे नागरिकांमध्ये भीती वाढली आहे.</p><p>दरम्यान आश्वीसह पंचक्रोशीत मागील काही वर्षांमध्ये बिबट्याची संख्या वाढल्यामुळे या बिबट्यांनी मोठ्या प्रमाणावर मोर व मुंगुसांची शिकार केली. सर्प हे मोर व मुंगुसांचे खाद्य असून या प्राण्याची संख्या घटल्याने सापाची संख्या वाढल्याचा अंदाज एका जाणकार व्यक्तीने वर्तवला आहे. तर यावर्षी झालेल्या अती पावसामुळे पाणी थेट भुगर्भात गेल्यामुळे जमिनीखाली राहणारे हे प्राणी स्वत:चा जीव वाचवण्यासाठी वरती आल्यामुळे नागरिकांच्या नजरेस पडत असल्याचे बोलले जात आहे.</p>