पुणतांबा |वार्ताहर| Puntamba
गावातील व परिसरातील करोना पॉझिटिव्ह रुग्णांना तातडीने पुणतांबा येथेच उपचार मिळावेत यासाठी येथील आशा केंद्रात कोव्हिड सेंटर सुरू करावे,
या किसान क्रांतीचे राज्य समन्वयक धनंजय जाधव यांच्या मागणीची आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे यांनी दखल घेऊन त्यांनी जिल्हाधिकारी अहमदनगर यांना तातडीने योग्य कार्यवाही करण्याची सूचना केली आहे.
श्री. जाधव व त्यांच्या सहकार्यांनी ना. टोपे यांची 15 सप्टेंबर रोजी मंत्रालयात प्रत्यक्ष गाठ घेऊन त्यांना लेखी निवेदन दिले होते पुणतांबा व परिसरात कोव्हिड रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यांना शिर्डी व अहमदनगर येथे तातडीने उपचार मिळण्यास अडचणी निर्माण होतात.
येथील आशा केंद्रातील रुग्णालयात सुसज्ज रुग्णालय आहे. डॉक्टरांचा पुरेसा स्टाफ, नर्सेस तसेच मूलभूत सुविधा आहेत त्यामुळे येथे कोव्हिड सेंटर सुरू केल्यास परिसरातील 11 गावांतील ग्रामस्थांची सोय होऊ शकेल ही बाब ना. टोपे यांच्या निदर्शनास आणून दिली.
ना. टोपे यांनी श्री. जाधव यांच्याच पत्रावर योग्य शेरा लिहून जिल्हाधिकारी अहमदनगर यांना तातडीने योग्य पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. काल पुणतांबा आघाडीचे चंद्रकात वाटेकर तसेच अॅड. सुधीर नाईक यांनी ना. टोपे यांचे पत्र जिल्हाधिकारी अहमदनगर यांना त्यांचे स्वीय सहाय्यक सुरेश आघाव यांच्याकडे अहमदनगर येथे सुपूर्द केले.
दरम्यान पुणतांबा येथे काल 13 जण करोना पॉझिटिव्ह सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे. त्यामुळे कोव्हिड सेंटर सुरू करण्याची गरज निर्माण झाली आहे.