कोल्हार (वार्ताहर) -
राहुरी तालुक्यातील चिंचोली येथील ग्रामसेवकाच्या मनमानीमुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. काही महत्त्वाच्या दाखल्यांसाठी या ग्रामसेवकाची
दिवसभर वाट पहावी लागते. वारंवार खेटे मारण्याची वेळ येते. महत्त्वाचे दाखले वेळेवर मिळत नसल्याने ग्रामस्थ आंदोलनाच्या तयारीत आहेत.
चिंचोली ग्रामपंचायतमधील ग्रामसेवकाकडे दोन गावे आहेत. त्यांच्याशी संपर्क केला असता मी दुसर्या ग्रामपंचायतमध्ये असल्याचे सांगितले जाते. येथील ग्रामसेवक सरपंच व इतर सदस्यांना सुद्धा किंमत देत नाही. सतत पंचायत समितीच्या कामाचे कारण दिले जाते. त्यामुळे येथील नागरिकांची महत्त्वाचे दाखले घेण्यासाठी किंवा इतर बाकी भरण्यासाठी ससेहोलपट होत आहे. नागरिकांची कामे खोळंबत आहेत. त्यामुळे या ग्रामसेवकाची मनमानी न थांबल्यास आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
याबाबत सरपंच गणेश हारदे यांनी सांगितले की, या ग्रामसेवकाची लवकरात लवकर बदली करण्यात यावी. कारण नागरिकांना त्यांच्यामुळे मनःस्ताप सहन करावा लागत असून विकास कामांमध्येही या ग्रामसेवकाकडून आडकाठी आणली जात आहे. त्यांची त्वरित बदली करण्याची मागणी सरपंच हारदे यांनी केली आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पांडू लाटे यांनीही या ग्रामसेवकाच्या मनमानी व आडेलतट्टू कारभारा विरोधात आंदोलन करणार असल्याचे म्हटले आहे.