अहमदनगर (प्रतिनिधी) | Ahmednagar -
वाढत्या करोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेने सर्व कर्मचार्यांची करोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी (आज) महापालिकेच्या वतीने मुख्यालयातील सर्व कर्मचार्यांची चाचणी होणार आहे. या चाचणीसाठी
सर्व खातेप्रमुख आणि कर्मचार्यांना उपस्थिती सक्तीची करण्यात आली आहे.
गेल्या महिनाभरापासून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात करोनाचे रुग्ण सापडत आहेत. त्यात जिल्हा परिषदेचाही समावेश आहे. मुख्यालयापासून ते ग्रामीण भागातील कर्मचार्यांपर्यंत बर्याच जणांना करोनाची लागण झाली आहे. यात आतापर्यंत जिल्हा परिषदेच्या एका अधिकार्यासह चार जणांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेने गेल्या आठवड्यापासून 50 टक्के कर्मचार्यांच्या उपस्थितीत कामकाज सुरू केले आहे. तसेच मागील महिन्यांत काही दिवस जिल्हा परिषदेचे पूर्ण कामकाजही बंद ठेवण्यात आले होते, परंतु तरीही करोनाचे रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाने सर्व कर्मचार्यांची चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
जिल्हा परिषदेत सुमारे 400 च्या जवळपास कर्मचारी आहेत. त्याप्रमाणे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी सर्व खातेप्रमुखांना पत्र देऊन मंगळवारी (दि. 8) आपल्या विभागातील सर्व कर्मचार्यांनी त्यांना दिलेल्या वेळेत मुख्यालयात उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. सकाळी दहा वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये महापालिकेतर्फे या चाचण्या होणार आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून करोनाचे रुग्ण वाढत आहेत. जिल्हा परिषद कर्मचार्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव त्यांची सर्वांची चाचणी करण्यात येत आहे. या चाचणीसाठी सर्व विभाग प्रमुखांना पत्र देवून कर्मचार्यांची उपस्थिती सक्ती करण्यात आले आहे.
- वासुदेव सोळंके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन विभाग.