<p><strong>सुपा |वार्ताहर| Supa</strong></p><p>आंदोलने फक्त काँग्रेस राजवटीतच करायची काय? बाकी आता रामराज्य अवतरले आहे काय, असा प्रश्न शिवसेनेने उपस्थित केल्याने </p>.<p>ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे संतप्त झाले आहेत. मी आंदोलने केली, त्यावेळी तुमचे मंत्री घरी गेले हे विसरलात काय? असा सवाल सेनेला करत तुम्ही त्या मंत्र्यांना कसे पाठिशी घातले. याची सर्व माहिती देईन, असा इशाराही त्यांनी दिला आहे.</p><p>हजारे यांनी आंदोलन स्थगित केल्यानंतर त्यांच्यावर विविध स्तरातून टीका सुरू झाली आहे. सोशल मीडियावरही अण्णांच्या आंदोलन मागे घेण्यावरून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यांच्या आणि भाजपाच्या संबंधांवरून प्रश्न विचारले जात आहेत. शिवसेनेने अण्णांनी शेतकरी आंदोलनावरून घेतलेल्या घुमजावावर थेट प्रश्न उपस्थित केले. लोकशाही, शेतकर्यांचे आंदोलन, शेतकर्यांचा स्वाभिमान याबाबत अण्णांना भूमिका घ्यावीच लागेल.</p><p>अण्णा नक्की कोणाच्या बाजूने? या प्रश्नांची उत्तरे निदान महाराष्ट्राला तरी कळायला हवीत, असे शिवसेनेने म्हटले आहे. यासंबंधी प्रसारमाध्यमांशी बोलताना हजारे यांनीही सडेतोड उत्तर दिले आहे.हजारे म्हणाले, गेल्या चाळीस वर्षांत 20 वेळा विविध प्रश्नांवर तसेच सर्वच पक्षांच्या विरोधात छोटी-मोठी अनेक आंदोलने केली आहेत. माझ्या आंदोलनातून आतापर्यंत सहा मंत्री घरी गेले आहेत. त्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपचेही नेते आहेत. </p><p>तुमच्या सरकारच्या काळात मंत्र्यांनी भ्रष्टाचार केला. तेव्हा तुम्ही त्या भ्रष्ट मंत्र्यांना पाठिशी घालत होतात. तेव्हाही मी आंदोलन केले. त्यावेळी तुमचे भ्रष्ट मंत्री घरी गेले हे विसरलात काय? तुमच्या मंत्र्यांनी कसा भ्रष्टाचार केला. तुम्ही त्याला कसे पाठिशी घातले. याची सर्व माहिती जाहीर करण्याचा इशाराही हजारे यांनी दिला.</p><p>आपण कधीही पक्ष-पार्टी पाहून आंदोलन करीत नाही, असा दावा अण्णांनी केला. समाज व देशाच्या हितासाठी आपण वेगवेगळ्या प्रश्नांवर आंदोलन करीत आलो. दिल्लीतील भाजप नेतृत्वातील केंद्र सरकार विरोधात 2014 पासून अनेक वेळा पत्रव्यवहार केला. तेव्हापासून या सरकार विरोधात आतापर्यंत सहा आंदोलने झाली आहेत. </p><p>दिल्लीत वन रँक वन पेन्शनसाठी व भूमी अधिग्रहण बिलाविरोधात तसेच शेतकर्यांचे प्रश्न व लोकपाल-लोकायुक्त कायद्याची अमंलबजावणीसाठी आंदोलन केले. त्यानंतर राळेगणसिद्धी येथेही 2019 मध्ये आंदोलन केले. हे त्यांना माहित नाही काय, असा सवाल हजारे यांनी शिवसनेला उद्देशून केला आहे.</p>