<p><strong>सुपा |वार्ताहर| Supa</strong></p><p>शुध्द आचार, शुध्द विचार, निष्कलंक जीवन, जीवनात थोडा त्याग व अपमान पचवण्याची सहनशीलता ही पंचसूत्री कार्यकर्त्यांमध्ये असली पाहिजे. </p>.<p>कार्यकर्त्यांनी माझ्यासारखे संपूर्ण जीवन त्यागून काम करायची गरज नाही. आपले घर, प्रपंच सांभाळून दिवसातून एखादा तास, आठवड्यातून एखादा दिवस समाजासाठी, समाजातील गोरगरीब, वंचितांच्या प्रश्नांसाठी दिला पाहिजे. मक्याच्या एका दाण्याला पहिले स्वतःला गाडून घ्यावे लागते. नंतरच त्या दाण्याचे भरदार कणीस तयार होते. </p><p>त्याप्रमाणे कार्यकर्त्यांनी स्वतःला गाडून घेऊन निःस्वार्थी काम करत रहावे, असे मार्गदर्शनपर आवाहन राळेगणसिद्धी येथे पार पडलेल्या माहिती अधिकार कायदा कार्यकर्ता कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केले.</p><p>माहिती सेवा समिती, महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने राळेगण सिध्दी येथे एक दिवशीय माहिती अधिकार कायदा कार्यकर्ता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अण्णांनी उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधून मार्गदर्शन केले. माहिती अधिकार कायदा, सेवा हमी कायदा व इतर काही कायदे वेळोवेळी सरकारला जागे करून व जनआंदोलन करून जनतेच्या हितासाठी पारित केले. 6 मंत्री व अनेक भ्रष्ट अधिकार्यांना घरीही पाठवले हे मी कायदा व न्याय व्यवस्थेद्वारे करू शकलो. कायद्यात एवढी ताकद आहे की, तुम्हीही कायद्याच्या आधारे असे काम करू शकता.</p><p>दुपारच्या दुसर्या सत्रात माहिती अधिकार कायदा प्रशिक्षक विठ्ठल बुलबुले यांनी कार्यकर्त्यांना माहिती अधिकार कायदा, कायद्याची रचना व माहिती, विविध कलमे, अर्ज कसा करावा. यापासून अपिल कसे करावे, याबाबत माहिती दिली. प्रशांत देशमुख, राजेंद्र नाणकर व चंद्री वारघडे यांनी सहभागी कार्यकर्त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. कार्यशाळेसाठी महाराष्ट्रातून पुणे, मुंबई, सातारा, सोलापूर, नगर, नाशिक, उस्मानाबाद, लातूर, नांदेड अशा वेगवेगळ्या जिल्ह्यांतून सुमारे 200 कार्यकर्ते या कार्यशाळेसाठी उपस्थित होते.सहभागी कार्यकर्त्यांना पाहुण्यांच्या हस्ते सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.</p><p>या महत्त्वपूर्ण कार्यशाळेच्या आयोजनासाठी माहिती सेवा समितीचे संस्थापक चंद्रकांत वारघडे, शिवाजीराव खेडेकर, बाळासाहेब चौधरी, पुणे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण गव्हाणे, सचिव प्रशांत महाराज भागवत, प्रशांत देशमुख, राजेंद्र नाणकर (नाशिक), संतोष काळे, सागर इंगळे, शरद ढेरंगे, कमलेश बहिरट, गणेश जाधव, प्रसाद जोशी, अंकुश कोतवाल, अॅड. गणेश म्हस्के (पुणे), बालाजी लंगोटे (नांदेड) यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रास्ताविक चंद्रकांत वारघडे यांनी केले तर सूत्रसंचालन गणेश सातव यांनी केले. आभार लक्ष्मण गव्हाणे व प्रशांत भागवत यांनी मानले.</p>