अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
केंद्र शासनाच्या अमृत अभियानांतर्गत दुसर्या टप्प्यामध्ये पाणी योजना व भुयारी गटार योजनेसाठी निधी मिळविण्यासाठी महापालिकेने नव्याने प्रकल्प अहवाल तयार केले आहेत. पाणी योजनेसाठी सुमारे 700 कोटी व भुयारी गटार योजनेसाठी सुमारे 650 कोटींचा प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला असून, दोन्ही अहवाल महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे सादर करण्यात आले आहेत.
नगर शहरात सध्या अमृत अभियानांतर्गत पाणीपुरवठा योजना व भुयारी गटार योजनेचे काम सुरू आहे. अमृतच्या पाणीपुरवठा योजनेचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. तर भुयारी गटार योजनेचे काम संथ गतीने सुरू आहे. भुयारी गटार योजनेत सध्या मध्य शहरातील कामांचा समावेश आहे. आता सावेडी, केडगाव, मुकुंदनगर, बोल्हेगाव, नागापूर याबाबत नव्याने ड्रेनेजलाईन प्रस्तावित करण्यात आली आहे. तसेच आणखी एक मलनि:सारण प्रकल्पही यात प्रस्तावित करण्यात आला आहे.
शहरात यापूर्वी फेज टू अंतर्गत पाण्याच्या टाक्या व अंतर्गत वितरण व्यवस्थेचे काम करण्यात आले आहे. या योजनेतील काही कामे अद्यापही प्रलंबित आहेत. त्यानंतर पाणी योजनेत नवीन जलशुध्दीकरण केंद्र, पाण्याच्या टाक्या, मुख्य जलवाहिनी, जुन्या टाक्यांची दुरूस्ती, जुन्या जलशुध्दीकरण केंद्राची दुरूस्ती, स्काडा यंत्रणा आदी विविध कामे करण्यात आली आहेत. नव्याने पाणी योजनेसाठी करण्यात आलेल्या प्रकल्प अहवालामध्ये नव्याने विकसित झालेल्या उपनगरांतील वितरण व्यवस्था, नवीन जॅकवेल, नवीन जलवाहिनी अशी विविध कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत.
खाजगी संस्थेमार्फत तयार केलेले दोन्ही प्रकल्प अहवाल महापालिकेने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे सादर केले आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या तपासणीनंतर तांत्रिक मान्यतेसाठी अहवाल पाठविले जाणार आहेत. तांत्रिक मान्यतेनंतर केंद्र शासनाच्या राज्यस्तरीय समिती समोर निधी मंजुरीसाठी अहवाल पाठविले जाणार असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले.