श्रीगोंदा (तालुका प्रतिनिधी) - अत्यावश्यक सेवा बरोबर इतर व्यवसायिकांनाही दुकाने सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी श्रीगोंदा व्यापारी असोसिएशनच्या वतीने पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे करण्यात आली. मंत्री मुश्रीफ बुधवारी श्रीगोंदा दौर्यावर होते. त्यावेळी त्यांना व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सतीश बोरा यांच्यासह प्रमुख व्यापारी यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले.
गेल्या दीड महिन्यांपासून व्यवसायिकांची दुकाने बंद आहेत. त्यामुळे हे सर्व व्यापारी आर्थिक अडचणीत आले आहेत. करोनावर मात करण्यासाठी लॉकडाऊन हा पर्याय तितकाच महत्वाचा असल्यामुळे सर्व व्यवसायिकांनी शासन नियमांचे पालन करण्यासाठी आपले व्यवसाय बंद ठेवले आहेत. छोट्या-मोठ्या व्यावसायिकांचे व्यवसाय बंद असल्यामुळे कर्मचारी पगार, जागा भाडे, बँक कर्ज यामुळे सर्वच व्यवसायिक मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. सध्या अत्यावश्यक सेवा सकाळी 7 ते 11 यावेळत सुरु आहेत. त्यांच्यासाठी जी नियमावली लागू करण्यात आली त्याच नियमांचे आधीन राहून इतर व्यवसायिकांना दुकाने सुरु करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे.