<p><strong>अहमदनगर (प्रतिनिधी) -</strong></p><p><strong> </strong>नगर कॅन्टोमेंट बोर्डच्या विद्यमान सदस्याचे अधिकार संपुष्टात येऊन बोर्डची सार्वत्रिक निवडणूक होईपर्यंत बोर्ड अध्यक्ष आणि प्रशासन बोर्डचा </p>.<p>कारभार पाहावा, असा केंद्र सरकारचा निर्णय म्हणजे बोर्ड पूर्ण बरखास्त झाले नाही, असे नमूद करुन अॅड.पिल्ले यांनी भिंगारसह देशातील सर्वच कॅन्टोमेंट बोर्ड पूर्ण बरखास्त करुन त्या-त्या ठिकाणी नगरपालिकेची स्थापना करावी, अशी मागणी करणारे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि खासदार डॉ.सुजय विखे पा. यांच्यासह संबंधित कॅन्टोमेंट बोर्डाच्या लोकसभा मतदार संघातील खासदारांना पाठविले आहे.</p><p>भिंगार काँग्रेस कमिटीच्यावतीने कमिटीचे अध्यक्ष अॅड.पिल्ले यांच्यासह काँग्रेस सेवा दल महिला शहर जिल्हा अध्यक्ष सौ.अलकाताई बोर्डे, प्रदेश काँग्रेस कमिटी सदस्य शामराव वाघस्कर, सदस्य रिजवान शेख, महिला अध्यक्षा सौ.मार्गारेट जाधव, किरणताई आळकुटे, संतोष फुलारी, अनिल परदेशी, अनिल वराडे, अॅड.साहेबराव चौधरी, रमेश त्रिमुखे, जालिंदर आळकुटे, नवनाथ वेताळ, संजय छत्तीसे, संतोष धीवर, संतोष कोलते, संजय खडके, संजय झोडगे, निजाम पठाण, दिपक लोखंडे, राहुल काळे, सुभाष त्रिमुखे, संतोष कांबळे आदिंच्या सह्या या निवेदनावर आहे.</p><p>निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, सन 1978 मध्ये देशाचे सरसेनापती कै.अरुण वैद्य अहमदनगर कॅन्टोमेंट बोर्डचे अध्यक्ष असतांना कॅन्टोमेंटबोर्ड पूर्ण बरखास्त करण्याचा ठराव मंजूर करुन केंद्र सरकारला पाठविला होता, त्यात सदर बाजारसहीत भिंगारला स्वतंत्र नगर पालिका स्थापन करावी, असा तो ठराव होता. त्यानंतर सन 1991 मध्ये खा.शरद पवार संरक्षण मंत्री असतांना अॅड.पिल्ले त्यावेळी कॅन्टों.बोर्डचे उपाध्यक्ष होते. त्यावेळचे खासदार यशवंंतराव गडाख पा. त्यांच्यामार्फत दिल्ली येथे कॅन्टों.बोर्डाच्या विकासाबाबत अधिकृत बैठक आयोजित केली होती, त्यावेळी दिल्ली, पुणे, नगर येथील सर्व लष्करी अधिकारी उपस्थित होते. तेव्हा अॅड.पिल्ले यांनी कॅन्टो.बोर्डच्या अडचणी मांडत असतांना शरद पवार यांनी सांगितले की, माझ्या मतदार संघात तीन कॅन्टों.बोर्ड असल्याने त्यांच्या सर्व अडचणी मला माहित आहेत. यावर रामबाण उपाय म्हणजे सर्व कॅन्टों.बोर्ड बरखास्त करुन तेथे नगर पालिका करण्यात याव्यात, असा निर्णय घेण्यात आला होता. मात्र तत्कालीन खासदार (पुणे) यांच्या विरोधामुळे त्याची अंमल बजावणी होवू शकली नाही, अन्यथा त्यावेळीच सर्व कॅन्टों.बोर्ड कार्य क्षेत्रात नगरपालिका अस्तित्वात आल्या असेही निवेदनात म्हटले आहे.</p><p><strong>50 वर्षांपासूनची मागणी</strong></p><p> <em>अहमदनगर कॅन्टोमेंट बोर्ड पूर्ण बरखास्त करुन भिंगारला नगरपालिका स्थापन करावी, अशी मागणी भिंगार काँग्रेस कमिटी गेल्या 50 वर्षांपासून सातत्याने करत आहे. आजपर्यंत या मागणीचा पाठपुरावा भिंगार काँग्रेसच पुढाकार घेऊन करत असून, भिंगार परिसराच्या विकासासाठी आता बोर्ड बरखास्त करणे गरजेचे आहे. त्यासाठी भिंगारकरांचा अंत पाहू नये, असे निवेदनात म्हटले आहे.</em></p>