अकोले |प्रतिनिधी| Akole
अकोले तालुक्यात कधीही जातीय तेढ निर्माण झाला नाही व यापुढेही होणार नाही. आज रमजान ईद निमित्ताने हिंदू मुस्लिम बांधवासाठी नगरसेविका सौ. तमन्ना मोहसिन शेख यांचा दावते ए शिरखुर्मा कार्यक्रम जातीय सलोख्याचे उत्तम उदाहरण असुन असाच सामाजिक सलोखा कायम राहील, असा विश्वास माजी आमदार वैभव पिचड यांनी व्यक्त केला.
अकोले शहरातील शाहूनगर येथील ईदगाह मैदानावर नगरसेविका सौ. तमन्ना मोहसिन शेख व मोहसिन शेख यांनी रमजान ईद निमित्ताने हिंदू मुस्लिम बांधवाचे ईद मिलन अर्थात दावत ए शिरखुर्मा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी वैभव पिचड बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर अकोलेचे तहसीलदार सतीश थेटे, पोलीस निरीक्षक मिथुन घुगे, नगराध्यक्षा सोनाली नाईकवाडी, उद्योजक राजेंद्र गोडसे, उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, अकोले एज्युकेशनचे कायम विश्वस्त गिरजाजी जाधव, अध्यक्ष इंजि. सुनील दातीर, सेक्रेटरी सुधाकर देशमुख, चेतनराव नाईकवाडी, मौलाना मौजुद, अमृतसागरचे उपाध्यक्ष रावसाहेब वाकचौरे, काँग्रेसचे युवा नेते विक्रम नवले, साईनाथ नवले, पाणीपुरवठा सभापती हितेश कुंभार, महिला व बाल कल्याण समिती सभापती प्रतिभा मनकर, नगरसेवक नवनाथ शेटे, आरीफ शेख, सागर चौधरी, शितल वैद्य, जनाबाई मोहिते, विजय पवार, परशराम शेळके, अमोल वैद्य, राहुल देशमुख, शंभू नेहे, सौ. सोमणी, भारत पिंगळे, प्राचार्य विद्याचंद्र सातपुते, शांताराम वैद्य, अल्ताफ शेख आदींसह अकोले शहरातील व शाहूनगर परिसरातील नागरिक व अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी रमजान ईदच्या शुभेच्छा देताना वैभव पिचड म्हणाले, रमजान महिन्यात मुस्लिम बांधव महिनाभर उपवास (रोजा) धरतात. यावेळी अल्लाहकडे समाजातील एकोप्याची, शांतता व सुरक्षेसाठी प्रार्थना (दुवा) करत असतात. अकोले तालुक्यात रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली. आज या रमाजान ईदच्या निमित्ताने दावते ए शिरखुर्मा कार्यक्रम अतिशय स्तुत्य कार्यक्रम नगरसेविका तमन्ना शेख व मोहसिन शेख यांनी केला आहे. असाच सामाजिक सलोखा तालुक्यात कायम राहील. अकोलेतील मुस्लिम समाजाच्या प्रश्नात कायम आपण व माजी मंत्री पिचड आपल्याबरोबर आहोत. यापूर्वीही माजी मंत्री पिचड साहेबांचे माध्यमातून या ईदगाह परिसराचे अनेक कामे मार्गी लागलेली असल्याचेही पिचड यांनी सांगितले.
याप्रसंगी अकोलेचे तहसीलदार सतिष थेटे, नगराध्यक्षा सौ. सोनाली नाईकवाडी यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सलिम शेख यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी अफजलभाई तांबोळी, हुसेन मन्सुरी, निलेश चौधरी, आवेश शेख, हैदर पठाण, फिरोज मन्सुरी, सांडूभाई शेख, महेश माळवे, मुज्जुभाई अत्तार, आबिद सय्यद, रणजित शिंदे आदींनी परिश्रम घेतले.