<p><strong>अकोले |प्रतिनिधी| Akole</strong></p><p>मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत राज्यातील जुन्या मंदिरांचे जतन करण्याचे काम करण्याची घोषणा करून त्याची आर्थिक तरतूद केली जाईल </p>.<p>असे म्हटले असून या निर्णयाबाबत ठाकरे सरकारचे अभिनंदन मात्र तालुक्यातील अनेक गड किल्ल्याकडे सरकार व पुरातत्त्व विभाग जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत हरीशचंद्रगड, अमृतेश्वर मंदिर, टाहाकरी मंदिराचे त्यात समावेश करून या मंदिरांचे सुशोभीकरण करावे अशी मागणी माजी आमदार वैभवराव पिचड यांनी केली आहे. याबाबत मुख्यमंत्री यांना तातडीने पत्रही पाठविले आहे.</p><p>पुरातन वास्तूचे जतन व संवर्धन करणे जबाबदारी राज्य पुरातत्व विभागाची आहे. हजारो वर्षाच्या वास्तूचे कालावधी लक्षात घेऊन शास्र शुद्ध संवर्धन आवश्यक असते. या नियमाला डावलून पुरातत्व खाते केवळ भेगा पडलेल्या दगडी चिर्यांना सिमेंट चोपडण्याचे काम करीत आहे. त्यामुळे ऐतिहासिक वास्तूंच्या सौंदर्याला बाधा पोहचवत आहे. </p><p>गड किल्ले, पुरातन मंदिरे आणि धर्मशाळा यांचे जतन करण्याचे व संवर्धन करण्याचे काम व जबाबदारी पुरातत्व विभागाला जिकरीचे वाटते, नव्हे तर ते याबाबीकडे दुर्लक्ष्य करत आहेत अनेक दुर्ग प्रेमींच्या भावना या गड किल्ल्यात व मंदिरात दडलेल्या आहेत. मात्र वर्षानुवर्षे या वास्तूकडे दुर्लक्ष्य केले जाते आहे. रस्ते बांधणी ठेकेदाराला ठेका देऊनही कामे काही अंशी उरकली जातात त्यामुळे प्राचीन वास्तूची रया जाते. </p><p>पुरातत्व अधिकार्यांचा स्थापत्य शैलीचा अभ्यास नसल्यास संवर्धनानंतर या वस्तू बेढब दिसतात हरीशचंद्रगड, अमृतेश्वर मंदिर, टाहाकारी मंदिर हेमाडपंथी शैलीतील मंदिरे आणि दीपमाळ, बुरुज, कोसळण्याच्या स्थितीत आहेत. तर अतिवृष्टीच्या काळात ही मंदिरे गळतात. मंदीराचे दगड सरकली आहेत. पुरातत्व खाते स्थानिकांना यात हस्तक्षेप करू देत नाही. त्यामुळे या वास्तू मोडकळीस आल्या असून हरीशचंद्रगडावरील विठ्ठल रुख्मिणी मातेची मूर्ती चोरीला जाऊनही पुरातत्व खाते साधी चौकशी व पोलीस केस करत नाही, त्या अर्थी त्यांना या वास्तूबद्दल आत्मीयता नाही. </p><p>गिरीप्रेमींनी, स्थानिक ग्रामस्थांनी आपणाकडे याबाबत ओरड केली असून याची मुख्यमंत्री यांनी चौकशी करून या वास्तूंचे खास बाब म्हणून निधी उपलब्ध करून जतन करावे व तातडीने हरीशचंद्र गड, अमृतेश्वर मंदिर, टाहाकारी मंदिर दुरुस्तीसाठी व सुशोभीकरणासाठी मुख्यमंत्री व अर्थमंत्री यांनी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी माजी आमदार पिचड यांनी केली आहे.</p>