<p><strong>श्रीगोंदा |प्रतिनिधी| Shrigonda</strong></p><p>केंद्र सरकारने लागू केलेला कृषी कायदा रद्द करावा, यासाठी शेतकरी आंदोलन करत आहेत. शेतकर्यांची मागणी योग्य असून </p>.<p>शेतकरी शेतात काबाडकष्ट करून पिकविलेल्या पिकांना योग्य बाजारभाव मागत आहेत. आमची पिळवणूक, लुबाडणूक नको फक्त आम्हाला न्याय द्या, अशी आर्त मागणी करत आहेत. शेतकरी जगला तरच देश जगेल असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. दरम्यान, कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी अजितदादांच्या स्वागतासाठी माजी मंत्री आ. बबनराव पाचपुते भाजपच्या कार्यकर्त्यांसह हजर होते.</p><p>श्रीगोंदा नगरपालिकेच्या कोट्यवधी रुपयांच्या विकास कामांचा लोकार्पण सोहळा व नवीन कामांचे भूमिपूजन ना.पवार यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, जगासह अख्खा देश व राज्याला करोना महामारीने थैमान घातल्याने शेती, उद्योगधंदे अडचणीत आल्याने राज्याचा विकास दर घसरला. मात्र, महाविकास आघाडीचे सरकार आर्थिक संकट असतानाही विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही. जिल्ह्याचा कोट्यवधी रुपयांचा डीपीडीसीचा खर्च 31 मार्च पर्यंत न झाल्यास तो निधी परत न मागता जिल्हा परिषद व नगरपालिकांना देण्यास नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना सांगितले आहे.</p><p>तसेच घोड आणि कुकडी प्रकल्पाला पाण्याची कमतरता भासत असल्याने व माणिकडोह धरण पूर्ण क्षमतेने भरत नसल्याने बोगद्याची मागणी मी जलसंपदामंत्री असल्यापासून होत आहे. याबाबतचा प्रश्न जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याशी बोलून अर्थ व नियोजन खाते माझ्याकडेच असल्याने तोही प्रश्न निकालात काढू. </p><p>यावेळी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आ. बबनराव पाचपुते, आ. संग्राम जगताप, माजी आमदार राहुल जगताप, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस, नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार, नगराध्यक्षा शुभांगी पोटे, गटनेते मनोहर पोटे, केशवराव मगर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, तालुका काँग्रेस अध्यक्ष दीपक पाटील भोसले, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे, शिवसेना तालुका अध्यक्ष बाळासाहेब दूतारे आदींसह काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.</p>