अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
करोना संसर्गाच्या महामारीमुळे दीड वर्षानंतर पहिल्या आज (सोमवारी) जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा प्रत्यक्षात सभागृृहात होणार आहे. या सभेत दीड वर्षानंतर सदस्यांना प्रत्यक्षा प्रश्न उपस्थित करून त्यावर सभागृहात चर्चा घडवून आणता येणार आहे. यामुळे आजची सभा गाजणार की गुंडाळणार याकडे जिल्ह्याचे लक्ष राहणार आहे.
अध्यक्षा राजश्रीताई घुले पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार्या सभेला मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्यासह सर्व विभाग प्रमुख पदाधिकारी, सदस्य हजर राहणार आहेत. जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात दुपारी एक वाजता ही सभा होणार आहे. या सभेत जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पाचे पुर्ननियोजन करण्यात येणार असून त्यानंतर सुधारित बजेटला मान्यता देण्यात येणार आहे.
यासह अन्यविषयांसह ऐनवेळी येणार्या विषयांवर चर्चा होणार आहे. यात जिल्हा परिषदेच्या जागा अन्य शासकीय संस्थांना देणे, नोंव्हेंबर महिन्यांपासून विद्यार्थ्यांचा रखडलेला शालेय पोषण आहाराचा विषय, जिल्हा परिषद शाळा खोल्यांची मंजूरी, यास अन्य विषयांचा यात समावेश राहणार आहे. यावेळी पदाधिकारी आणि प्रशासन त्यांची बाजू मांडणार असून सदस्य त्यांना धारेवर धरण्याची शक्यता आहे.