अहमदनगर (प्रतिनिधी) - वीज बिल वाढीविरोधात अहमदनगर मनसेने कलेक्टर ऑफिसवर आज मोर्चा काढला. वाढीव वीज बिल मागे घेत नाही तोपर्यंत मनसेचा मोर्चा सुरू राहिल, अशी माहिती मनसेचे संपर्कप्रमुख अनिल चितळे यांनी यावेळी दिली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने वीज बिल वाढीसंदर्भात आज राज्यस्तरीय आंदोलन करण्यात येत आहे. नगरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून मनसेचा मोर्चा निघाला. सहकार सेनेचे सरचिटणीस अनिल चितळे, जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, सरचिटणीस नितीन भुतारे, देवीदास खेडकर, दत्ता कोते, बाबा शिंदे, गणेश रांधवणे, गजेंद्र राशिनकर, दिगंबर पवार, बाळासाहेब माळी, राजेश लुटे, सतीश काकडे, ज्ञानेश्वर गाडे, वसिम राजे, सतीश म्हस्के, अॅड. अनिता दिघे, अमोल बोरुडे, अनिकेत जाधव, दिनेश जाधव, सुमित वर्मा, परेश पुरोहित, सुरेखा कोते, स्मिता भुजबळ, श्रद्धा बावर, संजय शेळके, तुषार बोबडे, विनोद काकडे, सुरेश जगताप यांच्यासह मनसे सैनिक मोर्चात सहभागी झाले होते.
चितळे म्हणाले, एप्रिल महिन्यापासूनच्या कडक टाळेबंदीमुळे नागरिकांचे अपरिमित आर्थिक नुकसान झाले. व्यवसायांना घरघर लागली. अनेकांनी नोकर्या गमवाव्या लागल्या. एका बाजूला आजाराची भीती आणि दुसरी ठप्प झालेले अर्थकरण या दोन्ही आघाड्यावर नागरिक लढा देत असताना, महाविकास आघाडी सरकाने नागरिकांना प्रचंड वीज बिल पाठवून शॉक दिल्याने जनतेचे डोळे पांढरे झाले. एप्रिल, मे, जून महिन्यात अनेक खाजगी आस्थापनाची कार्यालये बंद होती, पण तरीही त्यांना पण भरभक्कम वीज देयक पाठवली. पूर्वी जिझिया कर लावला जायचा. या सरकारने वीज देयकातून जिझिया कर लावला आणि जनतेची लुट करत असल्याचा आरोप यावेळी चितळे यांनी केला. जोपर्यंत वाढीव वीज बिल मागे घेत नाही, तोपर्यंत मनसे आंदोलन करत राहील, असे ते म्हणाले.
काही झालं तरीही वाढीव वीज देयकं भरु नका आणि हा असा असहकार पुकारल्याशिवाय सरकारलाही जनतेतील असंतोष जाणवणार नाही. सरकार तुमच्या वीजेची जोडणी तोडू शकत नाही आणि जर त्यांनी असा प्रयत्न केला तर त्यांचा संघर्ष मनसे सैनिकांशी असल्याचा इशारा नितीन भुतारे यांनी दिला.