
अहमदनगर (प्रतिनिधी)
करोनामुळे (corona) तब्बल दोन वर्ष निर्बंधात घालवल्यानंतर गुढी पाडव्यापासून (Gudi Padwa) जनजीवनाच्या नव्या पर्वाला सुरूवात होत आहे.
राज्य सरकारने सर्व निर्बंध हटविल्यामुळे सण आनंदात जाणार आहे. यामुळे पुढील काळासाठी चांगला संदेश गेल्याची प्रतिक्रीया बाजारपेठेत उमटली आहे. पूर्ण क्षमतेने व्यवसाय करता येणार असल्याने व्यापारीवर्गही उत्साहात आहे
करोनामुळे सर्वांनाच मोठा फटका बसला. अनेकांचे रोजगार गेले, उत्पन्न बुडाले आणि व्यवसायही अडचणीत आले. त्यात आजपर्यंत माफक असले तरी निर्बंध असल्याने भितीची टांगती तलवार कायम होती. मात्र आता संपूर्ण निर्बंधमुक्ती झाल्याने राज्यासह नगर शहराचे अर्थचक्रही पुन्हा एकदा गतीने फिरणार आहे.
गुढी पाडव्याचा सण नवी आशा घेवून येत आहे. गेल्या दोन वर्षातील कोणाचेही नुकसान भरून येणे शक्य नाही. मात्र यापुढील काळ चांगला राहील, अशी आशा बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. गेल्या काही दिवसांपासून बाजारपेठेत मरगळ आली होती.
गुढी पाडव्यापासून पुन्हा एकदा व्यवसाय उभारी घेणार अशी शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, उपस्थितीवरील निर्बंध हटल्याने पुन्हा एकदा बाजार, सभागृहातील कार्यक्रमांना गर्दी ओसंडून वाहणार आहे.