अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
हॉटेल अशोका चौक ते सक्कर चौक दरम्यान उभारण्यात आलेला उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला झाल्यापासून पुलावर पादचारी, हातगाडी, फेरीवाले, ठेलेवाले यांच्या हातगाड्या उभ्या करून किंवा उड्डाणपुलावरून हातगाडीसह प्रवास करून वाहतुकीस अडथळा निर्माण करत आहे. शुक्रवार 25 नोव्हेंबरपासून उड्डाणपुलावर पादचारी, हातगाडी फेरीवाले, ठेलेवाले व जनावरे नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी याबाबत आदेश काढले आहेत.
19 नोव्हेंबर रोजी उड्डाणपुलाचे उद्घाटन झाले असून सदर उड्डाणपूल सार्वजनिक वाहतुकीकरिता खुला करण्यात आलेला आहे. हा उड्डाणपुल शहरातील पहिलाच पुल असल्यामुळे उड्डाणपुलावरून पादचारी, हातगाडी, फेरीवाले, ठेलेवाले त्यांच्या हातगाड्या उभ्या करून व्यावसायक करत असून यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. तसेच काही इसम जनावरे घेवून जाण्यासाठी उड्डाणपुलाचा वापर करत आहेत.
काही उत्साही पादचारी उड्डाणपुलावर थांबून सार्वजनिक वाहतुकीस अडथळा निर्माण करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे भविष्यात एखादा गंभीर अपघात होवून कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता असल्याने उड्डाणपुलावर पादचारी, हातगाडी, फेरीवाले, ठेलेवाले, व जनावरे यांना प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात आला असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.