
अहमदनगर (प्रतिनिधी)
आयुक्तांनी लेखी आश्वासन देऊन देखील मुख्य बाजारपेठेतील कापड बाजार, मोची गल्ली, घास गल्ली, सारडा गल्ली, शहाजीराजे रस्ता, गंज बाजार या भागात पुन्हा हातगाड्या व पथारीवाले यांच्या अतिक्रमणाने बाजारपेठेचा श्वास कोंडला जात असून व्यापाऱ्यांच्या संयमाचा बांध फुटून तीव्र स्वरूपाचा आंदोलन करण्यास प्रोत्साहित करू नये अशा आशयाचे निवेदन अहमदनगर व्यापारी महासंघ, पंडित दीनदयाल परिवार, जागरूक नागरिक मंच, वंदे मातरम् युवा प्रतिष्ठानच्यावतीने आयुक्तांना देण्यात आले.
अतिक्रमणधारकांवर कारवाई केल्याचा केवळ बनाव केला जात असून मनपाकडून व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनानंतर किती हातगाड्या व पथारीवाले यांच्यावर कारवाई करण्यात आली व पुन्हा पुन्हा तेच अतिक्रमण धारक सदर ठिकाणी अतिक्रमण कशी काय करतात? त्यांच्याविरुद्ध खटले दाखल का केले जात नाही? त्यांचा माल जप्त का केला जात नाही? दंड का आकारला जात नाही? विशिष्ट भागात अतिक्रमण विरोधी पथकाचे कर्मचारी कारवाई करण्यास का धजावत नाही? सदर विशिष्ट भागातील कारवाई जाणून बुजून राबविली का जात नाही? असे प्रश्न सदर निवेदन देतेवेळी शिवसेनेचे शहर जिल्हाध्यक्ष संभाजी कदम व वसंत लोढा यांनी आयुक्त, पोलीस अधिक्षकांशी चर्चा करताना उपस्थित केले.
व्यापारी हा व्यापार सोडून रोजच अतिक्रमण विरोधात लढा देऊ शकत नाही. तरीदेखील नाईलाजास्तव बाजारपेठेचा अस्तित्व व ग्राहक वर्ग टिकून ठेवण्यासाठी व्यापाऱ्यांना व्यापार सोडून आंदोलनं करावी लागत आहेत, ही अहमदनगर शहराची शोकांतिका आहे. हातगाडी धारक व पथारीवाले यांचा महानगरपालिके द्वारे पुनर्वसन करून त्यांना इतर ठिकाणी स्थलांतरित करत त्यांना देखील त्यांच्या व्यवसाय व उदरनिर्वाहासाठी लवकरात लवकर जागा उपलब्ध करून देण्यात यावी परंतु यापुढे मुख्य बाजारपेठेत कोणत्याही परिस्थितीत अतिक्रमण सहन केला जाणार नाही असे देखील यावेळी सांगण्यात आले. जागृक नागरिक मंचाचे सुहास मुळे यांनी हातगाडी धारक व पथारीवाल्यांचा सदर अतिक्रमण विषयीचा प्रश्न गेली अनेक दशकांपासून प्रलंबित असून अहमदनगर महानगरपालिकेचे त्याकडे सोयीस्कररित्या होणारे दुर्लक्ष व मनपाच्या अतिक्रमण विभाग प्रमुखांकडून त्याबाबतीत कठोर कारवाई केली जात नसल्या कारणाने सदर प्रश्न आजपर्यंत मार्गी लागला नसल्याबाबत निदर्शनास आणून दिले. प्रत्येक वेळी मनपाकडून पोलीस संरक्षण मिळत नसल्याबाबत चा हवाला देत कारवाई टाळण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जातो व यामुळे काळ सोकावतो याची जाणीव महानगरपालिकेने ठेवावी व सदर प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावावा असे ठणकावून सांगितले.
अहमदनगर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ईश्वर बोरा यांनी व्यापाऱ्यांना धमकावण्याचे व त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणच्या रेकी केल्या जात असल्या बाबतचा प्रकार आयुक्त व पोलिस अधीक्षकांच्या निदर्शनास आणून दिला. व्यापाऱ्यांच्या व्यवसायाचे ठिकाणांना लक्ष करून त्यांच्याविरुद्ध खोट्यानाट्या स्वरूपाच्या अतिक्रमणाच्या तक्रारी देण्याचा व त्यांच्यावर खोटे व चुकीचे आरोप करून त्यांचा आवाज शमविण्याचेही प्रयत्न केले जात असल्याबाबत वंदे मातरम् युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवि किथानी व महावीर कांकरिया यांनी यावेळी सांगितले. व्यापाऱ्यांवर कुठल्याही प्रकारचा अन्याय झाल्यास मोठा उद्रेक होऊ शकतो असे देखील यावेळी उपस्थित काका शेळके यांनी सांगितले. यावेळी महासंघाचे उपाध्यक्ष अभिमन्यू जाधव, अमित नवलानी, रवी कराचीवाला, समीर बोरा, कमलेश अहुजा, शैलेश गांधी, विक्रम नारंग, ओमप्रकाश बायड, किशोर गुगळे, कुणाल नारंग, ऋषी येवलेकर, संदीप बायड, संभव काठेड, सौरभ भांडेकर, सागर पेटकर, ललित कटारिया, राहुल कटारिया आदी व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.