अहमदनगर (प्रतिनिधी)
गांजा व दारूचे नशेत मामाला जिवे ठार मारल्याप्रकरणी आरोपी भाचाला श्रीगोंदा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. एस. शेख यांनी भा. दं. वि. 302 अन्वये दोषी धरले. त्यानुसार जन्मठेप तसेच पाच हजार रूपये दंड व दंड न भरल्यास एक वर्षे साधी कैदेची शिक्षा ठोठावली आहे. मंगेश स्वामीनाथ केदारी (वय 42 रा. सातववाडी हडपसर, पुणे) असे शिक्षा झालेल्या भाचाचे नाव आहे. सदर खटल्याचे कामकाज अतिरिक्त सरकारी अभियोक्ता सौ. संगिता अनिल ढगे यांनी पाहिले.
मांडवगण फाटा (ता. श्रीगोंदा) गावचे शिवारात गट नं. 819 मधील शेतात दिनांक 27 ऑगस्ट, 2020 रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली होती. घटनेची थोडक्यात हकीगत की, भाचा मंगेश स्वामीनाथ केदारी व मामा कानिफनाथ संपत गांगर्डे यांच्यात झालेल्या शाब्दीक भांडणाच्या कारणावरून मंगेश स्वामीनाथ केदारी याने लाकडी दांडा कानिफनाथ संपत गांगर्डे यांच्या डोक्यात मारून त्यांना जिवे ठार मारून त्यांचा खुन केला होता. या प्रकरणी भा. दं. वि. कलम 302 नुसार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला होता. सदर गुन्ह्याचा तपास पुर्ण झाल्यानंतर आरोपीविरूध्द पोलीस निरीक्षक डी. एस. जाधव यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
सदर खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायाधीश शेख यांच्या न्यायालयात झाली. सदर खटल्यामध्ये सरकार पक्षाच्यावतीने एकुण 13 साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये फिर्यादी, पंच साक्षीदार, स्वतंत्र साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी, तपासी अधिकारी यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या.
सदर खटल्यामध्ये सरकार पक्षाच्यावतीने अतिरीक्त सरकारी वकील सौ. ढगे यांनी काम पाहिले. न्यायालयासमोर आलेला साक्षी पुरावा व सरकारी वकीलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला वरील प्रमाणे शिक्षा ठोठावली. सदर खटल्यात पैरवी अधिकारी संतोष सुधाकर फलके, गणेश ठोंबरे, सौ. आशा खामकर व सौ. दिपाली भंडलकर यांनी सहकार्य केले.