अहमदनगर (Ahmednagar)
ऐतिहासिक वारसा असलेले भिंगार शहर 'मावा' (सुगंधी तंबाखू) तयार करणाऱ्या मिनी कारखान्यांमुळे चांगलेच चर्चेत आले आहे. अन्न प्रशासनच्या दुर्लक्षाने आणि भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यातील 'खाकी' च्या आशीर्वादाने भिंगार शहर मावा निर्मितीचे आगर बनले आहे.
नगर शहरापासून भिंगार शहर हे अवघ्या चार किलोमीटर अंतरावर आहे. लष्करी तळ लाभलेल्या भिंगारमधील गुन्हेगारीच्या नियंत्रणासाठी भिंगार कॅम्प पोलीस ठाणे आहे. कल्याण-विशाखापट्टण राष्ट्रीय महामार्ग या शहरातून जातो. नागरदेवळे, बुऱ्हाणनगर, ब्रह्मतळे, कापूरवाडी, शहापूर केकती, दरेवाडी, सैनिकनगर डेअरी फार्म आदी भाग भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत येतो. सध्या हाच परिसर मावा निर्मितीमुळे चर्चेत आहे. या धंद्यात अनेक तरुण उतरले आहेत. विशेष करून त्यांना खाकीचा देखील सपोर्ट मिळत आहे. परिणामी मावा निर्मितीसाठी भिंगार परिसर एकप्रकारे आगर बनले आहे.
दिवसाला लाखो रुपयांची उलाढाल असलेल्या या अवैध व्यवसायातून छुप्या गुन्हेगारीला देखील बळ मिळत आहे. कमी श्रमात अधिक पैसा येत असल्याने त्यातून वेगवेगळे अवैध धंदे जन्माला येत आहेत. या अवैध व्यवसायाचे आणि गुन्हेगारीला बळ देणारे अर्थकारण अभ्यासल्यास लाखो रुपयांची उलाढाल समोर येते. मावा निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल हा छुप्या पद्धतीने आणला जातो. सुपारीचा चुरा, तंबाखू, सुगंधी पावडर, चुना, इतर रासायनिक द्रव्ये आदींचा यात समावेश असतो. या सर्व साहित्याची वाहतूक खुलेआम होते.
सुगंधी तंबाखू तयार करण्यासाठी लागणारी यंत्रणा ही मनुष्यबळाऐवजी विद्युत यंत्रणेवर असते. त्यामुळे कमी मनुष्यबळ लागते आणि बोभाटा देखील होत नाही. मावा निर्मितीसाठी विद्युत यंत्र (मिक्सर) वापरले जातात. या मिक्सरची किंमत सुमारे ७५ ते ८० हजार रुपयांपर्यंत आहे. या मिक्सरमधून दिवसभरातून लाखो रुपयांचा माल तयार केला जातो. तयार झालेली ही सुगंधी तंबाखू त्यानंतर पुन्हा छोट्याछोट्या पांढऱ्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये भरली जाते.
काही वेळेस हीची तिथेच पॅकिंग केली जाते किंवा ती विक्रीसाठी किलोवर थेट पानटपरींवर पोहच केली जाते. या वितरणासाठी स्वतंत्र यंत्रणा असते. विशेष करून दुचाकीचा वापर यासाठी केला जातो. ऑर्डरप्रमाणे शहरातील पान टपऱ्यांवर मावा पोहोचविली जाते. हा माल पोहोचविण्याची वेळ देखील ठरलेली असते. विशेष करून, सकाळी नऊच्या आत हा माल वितरित केला जातो.
'खाकी'च्या सहकार तत्वावर धंदा
खाकीच्या सहकार तत्त्वावर हा धंदा भिंगारमध्ये फोफावत आहे. या अवैध धंद्यासाठी छुपा अडोसा महत्त्वाचा असतो. त्यासाठी नामी शक्कल लढविल्या जातात. पत्र्याच्या शेड उभारल्या गेल्या आहेत. ही शेड गोदामे भासवली जातात. त्याच्या आड सुगंधी तंबाखुची निर्मिती होते. या गोदामांना रात्रंदिवस बाहेरून कुलूप असते. त्यामुळे कोणालाही संशय येत नाही. परंतु आतमध्ये सुगंधी तंबाखुची निर्मिती जोरात सुरू असते. नागरी वसाहतीमध्ये घर घेऊन हा धंदा थाटला आहे. या अवैध धंद्याची माहिती अन्न प्रशासन, भिंगार कॅम्प पोलिसांना नसली, तरच नवलच म्हणावे लागेल!