अहमदनगर (प्रतिनिधी) -
करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना म्हणून विविध उपाय योजना करण्यात येणार
आहेत. सध्यातरी जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यासारखी परिस्थिती नाही. मात्र, करोना नियमांचे पालन न करता संसर्ग वाढण्यास कारणीभूत ठरणार्यांवर कडक करावाई करण्यात येणार आहे. तसेच लवकरच दहावी आणि बारावीची परीक्षा असणार्या शाळा वगळून आठवी, नववी आणि अकरावीच्या शाळा बंद करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली.
जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी शुक्रवारी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, जिल्ह्यात सध्या करोनाच्या 4 हजार 121 केसेस आहेत. यात मनपा हद्दीत 1 हजार 580 केसेस असून ग्रामीण भागात सर्वाधिक रुग्ण राहाता तालुक्यात 450 आहेत. यासह संगमनेर, श्रीरामपूर, कोपरगाव या ठिकाणी जादा रुग्ण आहेत. करोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी ग्रामीण भागात कोविड केअर सेंटर सज्ज असून त्या ठिकाणी 2 हजार बेड उपलब्ध आहेत. आता करोना बाधितांना घरात विलग करण्यापेक्षा त्यांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात दाखल करून उपचार करण्यात येणार आहे. मास्कचा वापर सर्वत्र अनिर्वाय करण्यात आला आहे.
जिल्ह्यात लॉकडाऊनची परिस्थिती नसून नागरिकांनी मास्कचा वापर करावाा. लग्न समारंभ आणि प्रवास यामुळे करोना संसर्ग वाढत असून यामुळे प्रशासनाने लावलेल्या निर्बंधाचे काटेकोर पालन आवश्यक आहे. मास्क न वापरणार्या 30 हजार लोकांना दंड करून 45 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. जे दुकानदार त्याच्या दुकानात मास्क सक्ती करणार नाहीत. त्यांची दुकाने सात दिवस बंद ठेवण्यात येणार आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 87 टक्के लसीकरण झाले असून ग्रामीण भागात 22 तर शहरात खासगी हॉस्पिटलसह 2 कोविड केअर सेंटर कार्यान्वित करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
...................