भिंगारचा पाणीप्रश्न न सुटल्यास पालकमंत्र्यांना घेराव घालणार

सर्वपक्षीय आंदोलनात नागरिकांचा इशारा
भिंगारचा पाणीप्रश्न न सुटल्यास पालकमंत्र्यांना घेराव घालणार

अहमदनगर (प्रतिनिधी) - भिंगारच्या पाणीप्रश्नावर नागरिकांनी कॅन्टोन्मेंट बोर्डावर आज (सोमवारी) मोर्चा काढला. पाणीप्रश्न न सुटल्यास पालकमंत्र्यांना घेराव घालणार असा इशारा असणारे निवेदन सीईओ विद्याधर पवार यांना देण्यात आले. याप्रसंगी प्रकाश लुणिया, महेश नामदे, शामराव वाघस्कर, अनिरुद्ध देशमुख, अमित काळे यांच्यासह सर्वपक्षीय कार्यकर्त्यांसोबतच नागरिक उपस्थित होते.

यावेळी महेश नामदे म्हणाले की, भिंगार भागातील सातही वार्डात गेल्या अनेक महिन्यांपासून पाण्याबाबत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. याबाबत नागरिकांनी, समाजसेवी संस्थांनी, विविध पक्षांनी याबाबत कॅन्टोंमेंट बोर्डाकडे सूचना, तक्रारी, निवेदने दिली परंतु पाणी वितरणाबाबत काहीही सुधारणा झालेली नाही. याबाबत संबंधितांना विचारपुस केल्यास पुरवठा अधिकार्यांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. गेल्या अनेक महिन्यांपासून नागरिकांना पाण्याबाबत अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहेत. तेव्हा आता आपणाच यात लक्ष घालून भिंगारचा पाणी प्रश्न सोडवावा, अशी आमची नागरिक व सर्व पक्षाच्यावतीने मागणी आहे. यापूर्वीही खा.सुजय विखे यांनी भिंगारमध्ये येऊन पाणी प्रश्नाबाबत बैठकही आयोजित केली होती. त्यानंतर हा प्रश्न त्यांनी संसदेतही उपस्थित केला होता. तरीही अद्याप कॅन्टोंमेंट बोर्डाकडून याबाबत काहीही सुधारणा झालेली नसल्याचे नामदे यांनी सांगितले.

याप्रसंगी प्रकाश लुणिया म्हणाले, भिंगारच्या पाणी प्रश्नांबाबत कॅन्टोंमेंट बोर्डाकडे अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत, परंतु यात काही सुधारणा होत नाही. अधिकारीही प्रत्येकवेळी महानगरपालिका, एमआयडीसी येथूनच प्रॉब्लेम असल्याचे सांगतात. परंतु हा प्राब्लेम कधी मिटणार? याबाबत ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. त्यासाठी नागरिकही पाहिजे ते सहकार्य करण्यास तयार आहेत. परंतु भिंगारचा प्रश्न मिटवा, अशी तीव्र भावना व्यक्त केली.

यावेळी कॅन्टोंमेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले की, पिण्याचे पाणी नियमित व पुरेशा दाबाने मिळावे. पाणी सोडण्यात काही तांत्रिक अडचण असल्यास त्याबाबत वर्तमान पत्र, लाऊडस्पिकर वरुन सूचना देण्यात याव्यात. पाणी सोडण्याची वेळ निश्चित असावी. पाण्याची लाईनची दुरुस्ती व्हावी. छावाणी परिषदेसाठी स्वतंत्र्य पाणी योजना राबविण्यात यावी, यासाठी बोर्डाने पुढाकार घ्यावा, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विद्याधर पवार यांनी शिष्टमंडळाशी बोलतांना सांगितले की, भिंगारला ज्या प्रमाणात पाणी उपलब्ध होते, त्या प्रमाणात ते वितरित केले जाते. अजूनही पाण्याबाबत महानगरपालिका, जिल्हाधिकारी, एमआयडीसी कार्यालयातील वरिष्ठांशी चर्चा सुरु आहे. लवकरच यातून मार्ग काढू भिंगारच्या नागरिकांना पुरेशा प्रमाणात पाणी वितरीत करण्याचा प्रयत्न असल्याचे शिष्टमंडळास सांगितले.

यावेळी दत्ता खताडे, किशोर गोंधळे, संतोष धीवर, विजय भिंगारदिवे, निलेश फिरोदिया, सुरेश अंधारे, सनी भोसले, निर्मला बैद, पोपटराव नगरे, प्रदीप मुळे, संजय फुलारे, सुरेखा केदारे, सचिन नवगिरे, दत्तात्रय वराडे, गणेश भोसले, संदिप झोडगे आदिंसह ज्येष्ठ नागरिक संघ, जनआधार संघ, सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी, स्वयंसेवी संघटना आदिंचा या आंदोलनास पाठिंबा होता.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com