<p><strong>शिर्डी |शहर प्रतिनिधी|Shirdi</strong></p><p>महावितरणने 75 लाख वीज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवली असून महाराष्ट्रातील 4 कोटी जनतेला अंधारात टाकण्याचं काम </p>.<p>महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षाने केलेले आहे. महावितरणाच्या निषेधार्थ भाजपच्यावतीने महाराष्ट्रभर राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार असून दि. 5 फेब्रुवारी रोजी उत्तर नगरमध्ये भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, आ. राधाकृष्ण विखे पाटील, स्नेहलता कोल्हे, वैभव पिचड, बाळासाहेब मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध ठिकाणी महावितरणाच्या कार्यालयावर हल्लाबोल करत टाळे ठोकून आंदोलनाचा इशारा देण्यात येणार आहे.</p><p>अनेक ठिकाणी घरगुती ग्राहकांकडे वसुलीसाठी महावितरणची यंत्रणा सक्ती करत आहे. मोबाईलवरून नोटीस पाठवून वीज बिल भरा, अन्यथा वीजपुरवठा खंडित करणार असल्याचे म्हणतात. जोपर्यंत लॉकडाऊन काळातील वीज बिलांचा निर्णय होत नाही, तोपर्यंत आम्ही नियमित बिले भरणार नाही, असे महावितरणला यामागेही झालेल्या आंदोलनात सांगण्यात आले होते. तरीही सक्ती करणार असाल तर आक्रमक भूमिका घेण्यात येईल. तरीही सरकारने या मागण्या मान्य केल्या नाही तर महावितरणाच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला जाईल, असे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी स्पष्ट केले आहे.</p><p>लॉकडाऊन काळात वीज ग्राहकांना वाढीव बिलांचा धक्का बसला. आधीच अनेकांचे रोजगार गेले, त्यात वाढीव वीज बिले आल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. अशा परिस्थितीत सरकारचे हे असंवेदनशील धोरण सर्वसामान्यांच्या जीवावर उठणारे आहे. सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी भाजपा सरकार या महावितरणाच्या निषेधार्थ राज्यव्यापी आंदोलन महाराष्ट्रात करणार आहे.</p>