श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
शेतकर्यांच्या शेतात विज वितरण कंपनीने उभारलेल्या डीपी, तारा, पोल, ताण टॉवर यासाठी वापरत असलेल्या जागांचे भू-भाडे शेतकर्यांना द्यावे, अशी मागणी शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अॅड. अजित काळे यांनी केली.
यासंदर्भातील याचिकेच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील कारेगाव येथे झालेल्या जाहीर सभेत अॅड. काळे बोलत होते. लक्ष्मण पटारे अध्यक्षस्थानी होते. यावेळी प्रहारचे अप्पासाहेब ढूस, छावाचे नितीन पटारे उपस्थित होते.
अॅड. काळे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या अनुषंगाने भू-भाडे देणेची तरतूद ब्रिटिश कायदा 1885 नुसार देणे वीज कंपनीला बंधनकारक आहे. याबाबत शेतकरी जनजागृती मोहिमेची सुरुवात संघटनेचे तालुकाध्यक्ष युवराज जगताप यांनी पुढाकार घेऊन कारेगाव येथून केली. या मागणीचे फॉर्म भरून शेतकरी संघटनेकडे देण्याचे आवाहन त्यांनी केले.
जिल्हाध्यक्ष अनिल औताडे म्हणाले, अन्न सुरक्षा योजनेच्या माध्यमातून शासन 67 टक्के वीजबिल कंपनीला देत आहे. परंतु वीज कंपनी 33 टक्केच वीज देते. त्यामुळे शेतकर्याचेच जास्तीचे पैसे कंपनीकडे गेले. त्यात आता भू-भाडेचा विषय वेगळाच आहे. त्यात कंपनी डीपी जळाल्यावर बिल भरल्याशिवाय दुरुस्त करून देत नाही. त्याबाबत शेतकर्यांच्या बाजूचा कायदा आहे. प्रति ग्राहक 50 रुपये प्रति तास याप्रमाणे नुकसान भरपाई मागण्याची तरतूदही आहे.
श्री. ढूस म्हणाले, ज्यावेळी शेतकर्यांचा प्रश्न येतो त्यावेळी प्रहार शेतकर्यांबरोबर असतेच. मागील काळातही शेतकरी संघटनेबरोबर काम केले असून यापुढेही करू.
शेतकरी संघटनेचे राज्य सचिव रुपेंद्र काले, राहुरी तालुकाध्यक्ष नारायण टेकाळे, नेवासा तालुकाध्यक्ष हरिभाऊ तुवर, देवळालीचे प्रशांत कराळे, ज्येष्ठ कार्यकर्ते सुदाम औताडे, प्रभाकर कांबळे आदींनी मनोगत व्यक्त केले. डॉ. दादासाहेब आदिक, भास्कर तुवर, डॉ. नवले, युवा आघाडीचे शरद आसने, संदीप उघडे, इंद्रभान चोरमळ, अरुण कवडे, अकबर शेख, बबन उघडे, रमेश उंडे, रमेश पटारे, सुनील पटारे, लक्ष्मण भवार, अनिल कहांडळ, बाळासाहेब पटारे, डी. वाय. पटारे आदींसह शेतकरी उपस्थित होते. अण्णासाहेब शेळके यांनी आभार मानले.