अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
नातवाला दुचाकीवरून घरी घेऊन जाणार्या आजोबांना धडक बसल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. अहमदनगर - कल्याण महामार्गावर शिवाजीनगर उपनगरातील मोहटादेवी मंदिराजवळ शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. प्रकाश भाऊसाहेब पवळ (वय 75 रा. आदर्श कॉलनी, नालेगाव, अहमदनगर) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.
ते त्यांच्या मुलीचा मुलगा शिवांश (वय 3) यास घरी घेऊन आले होते. शिवांश याला सायंकाळी त्याच्या घरी सोडण्यासाठी ते दुचाकीवरून जात होते. कल्याण महामार्गावरील मोहटा देवी मंदिराजवळ त्यांच्या दुचाकीला धडक देऊन वाहन चालक पळून गेला. या अपघातात प्रकाश पवळ यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. त्यांचा नातू शिवांश हा जखमी झाला. सुवर्णा रावसाहेब गुंड (वय 46 रा. साई प्रसाद अपार्टमेंट, शिर्डी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.