अहमदनगर (प्रतिनिधी) -
लाकडी दांडक्याने मारहाण करून महिलेचा जीव घेणार्या तिघांविरूद्ध तब्बल चार वर्षांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा
दाखल झाला आहे. हा गुन्हा तपासकामी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.
गिता ऊर्फ गितांजली बाणेश्वर काळे (रा. बुर्हाणनगर ता. नगर) असे खून झालेल्या महिलेचे नाव ओह. दादा विठोबा कोकरे (रा. लोणी व्यंकनाथ ता. श्रीगोंदा), दिलीप भापकर (रा. बाणगाव ता. श्रीगोंदा) व एक अनोळखी इसम असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. भिंगार पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पंकज शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत सुरूवातील एप्रिल 2017 मध्ये भिंगार पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. 16 मार्च 2017 रोजी सायंकाळी पाच वाजता गितांजली काळे श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव फाटा येथे बसमधून उतरून पायी जात असताना आरोपींनी त्यांना रस्त्यात आडविले होते. आरोपी दादा कोकरे गितांजली यांना म्हणाला, तुझी आई सुकली हिने माझ्यावर केलेली केस काढून घे. यावर गितांजली यांनी कोकरे याला नकार दिला होतो. याचा राग आल्याने आरोपी कोकरे याने गितांजलीला लाकडी दांडक्याने मारहाण केली होती. तर इतर दोघांनी शिवीगाळ, दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती. गितांजली यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू असताना 2 एप्रिल 2017 रोजी त्यांचा मृत्यू झाला होता.
याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. या घटनेची चौकशी करून उपनिरीक्षक पंकज शिंदे यांनी आरोपींविरोधात खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा तपासकामी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात वर्ग केला असून पुढील तपास श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक अरविंद माने करीत आहे.