<p><strong>अहमदनगर (प्रतिनिधी) - </strong></p><p>राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने जिल्ह्यातील शाळा बाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी 1 ते 10 मार्च दरम्यान </p> .<p>विशेष मोहिम राबविली. यात जिल्ह्यात 883 नव्याने शाळाबाह्य आढळून आलेले आहेत. दरम्यान, लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने राबविलेल्या मोहिमेत 1 हजार 3 शाळाबाह्य आढळून आले होते. त्यांना त्याचवेळी शाळेत दाखल करण्यात आले आहे.</p><p>गेल्यावर्षी करोना लॉकडाऊनमुळे मोठ्या प्रमाणात कुटूंबांचे स्थलांतर झाले. यामुळे मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची भिती व्यक्त होत होती. यामुळे यंदाचे शाळाबाह्य विद्यार्थ्यांची शोध मोहिम गंभीरपणे राबविण्याचे आदेश शिक्षण विभागाला देण्यात आले होते. त्यानूसार 1 ते 10 मार्च दरम्यान जिल्ह्यात प्रत्येक शाळेतील शिक्षकांसह गावातील तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील या मोहिमेत सहभागी होवून शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेत होते.</p><p>या मोहिमेत अवघे 833 शाळाबाह्य आढळून आलेले आहेत. नगर जिल्हा परिषदेने स्वत:च्या पातळीवर राबविलेल्या मोहिमेत मार्चपूर्वीच 1 हजार 3 विद्यार्थ्यांना शाळात दाखल करण्यात आलेले आहे. यामुळे मोहिम काळात सापडलेल्या शाळाबाह्य विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे.</p><p>.................</p><p><strong>असे आहेत सापडलेले शाळाबाह्य मुले</strong></p><p>अकोले आणि संगमनेर प्रत्येकी 23, कोपरगाव 18, श्रीरामपूर 257, राहाता 28, राहुरी 183, नेवासा 12, शेवगाव 80, पाथर्डी 48, कर्जत 33, जामखेड 2, श्रीगोंदा 110, पारनेर 32, नगर 34 असे आहेत.</p><p>................</p><p><strong>जिल्ह्यात होणार फेरसर्व्हेक्षण</strong></p><p>जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीच्या बैठकीत शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या विषयावर चर्चा झाली असून या मोहिमेत एकही विद्यार्थी सुटू नयेत, यासाठी शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे जिल्ह्यात फेर सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे</p>