<p><strong>अहमदनगर/श्रीगोंदा (प्रतिनिधी) -</strong> </p><p>निर्यात बंदीनंतर कांद्याचे भाव पडले आहेत. केंद्र शासनाने कांदा निर्यातबंदी न उठविल्यास कांदा उत्पादक शेतकरी भाजपच्या</p>.<p>खासदारांना कांदे मारण्याचे आंदोलन करतील, असा निर्णय श्रीगोंदा येथे झालेल्या नगर व पुणे जिल्ह्याच्या संयुक्त बैटकीत करण्यात आला. शेतकरी संघटनेचे प्रणेते स्व. शरद जोशी यांच्या पाचव्या पुण्यतिथीनिमित्त बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी दिली.</p><p>कांद्याचे ठोक विक्री दर 60 रुपये किलोच्या पुढे गेल्यानंतर केंद्र शासनाने कांद्याची निर्यात बंद केली, साठ्यांवर मर्यादा घातली, परदेशातून आयात केली, व्यापांर्यावर छापे टाकून कांद्याचे दर पाडले आहेत. अनेक शेतकर्यांकडे अद्यपही साठवलेला कांदा आहेत. डिसेंबर अखेर व जानेवारी महिन्यांच्या सुरुवातीला नविन कांदा बाजारात यायला सुरुवात होते. हा कांदा बाजारात आल्यानंतर दर आणखी कोसळण्याची शक्यता आहे. कांदा उत्पादक शेतकर्यांच्या हिताचा विचार करून केंद्र शासनाने तातडीने कांदा निर्यात बंदी कायमची उठविण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली. 31 डिसेंबरपर्यंत कांदा निर्यातबंदी न हटविल्यास 1 जानेवारीपासून कांदा उत्पादक शेतकरी दिसतील तेथे भाजपच्या खासदारांना कांदा मारण्याचे आंदोलन करतील असा निर्णय या बैठकीत करण्यात आला.</p><p><strong>उत्तर नगर जिल्हाध्यक्षपदी मधुकर शिंदे</strong></p><p> <em>या बैठकीत शेतकरी संघटनेच्या उत्तर नगर जिल्हाध्यक्ष पदावर संगमनेरचे मधुकर शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली. नगर दक्षिण जिल्हाध्यक्ष पदावर विक्रम शेळके, नेवासा तालुका अध्यक्ष पदावर कुलदीप देशमुख, श्रीगोंदा तालुका अध्यक्ष पदावर पोपट झगडे, श्रीगोंदा तालुका उपाध्यक्ष पदावर बाळासाहेब सातव यांची नियुक्ती करण्यात आली. पुणे जिल्हा अध्यक्ष पदावर लक्ष्मण रांजणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीगोंदा फॅक्टरी येथील अनिल घनवट यांच्या निवासस्थानी ही संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस पश्चिम महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल चव्हाण, पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्षा सीमा नरोडे उपस्थित होत्या.</em></p>