जानोरी | वार्ताहर
विळवंडी नाईकवाडी रस्त्यालगत वास्तव्यास असलेले पारधी कुटुंबातील दोन सख्या शाळकरी मुलींचा जीव गेला. हे वृत्त दैनिक देशदूतने प्रसिद्ध करताच याची खासदार डॉ. भारती पवार यांनी दखल घेतली. दिंडोरी प्रशासनाला धारेवर धरत तेथे तात्काळ पाण्याची सोय व्हावी असे आदेश करण्यात आले.
घडलेला प्रकाराची दखल घेऊन खा. भारती पवार यांनी दिंडोरी पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना भ्रमनध्वनी वरून संपर्क करून तिथे तत्काळ पाण्याची व्यवस्था करावी असे आदेश दिले. विळवंडी येथील विहिरीत पडून मृत्यू झालेल्या मुलींच्या कुटुंबियांना तत्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी खा. भारती पवार यांनी सहाय्यक आयुक्त आदिवासी विकास विभाग यांच्याकडे केली आहे.
विळवंडी नाईकवाडी रस्त्यालगत वास्तव्यास असलेल्या पारधी परिवारातील सख्या बहिणी पद्मा उत्तम पारधी व फाशाबाई उत्तम पारधी या दोघी विहिरीतून पाणी बाहेर काढत असताना पाय घसरून विहिरीत पडून त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या दोघी बहिणी रोहिले ता.त्र्यंबकेश्वर येथील आदिवासी विकास विभागाच्या आश्रम शाळेत शिकत होत्या.तरी विळवंडी येथील विहिरीत पडून मृत्यू झालेल्या मुलींच्या पारधी परिवारास शासकीय मदत लवकरात लवकर जाहीर करावी अशी मागणी खा. भारती पवार यांनी केली आहे.