नाशिक । प्रतिनिधी Nashik
गाव मग ते छोटे असो की, मोठे निष्काळजीपणे कचर्याची विल्हेवाट लावणारे लोक हे प्रत्येक गावात हमखास असतातच.अशा प्रकारे इतरत्र कचरा टाकणार्यांना थांबवून त्यांची ती चूक त्यांच्या निदर्शनास आणून देण्याचे काम जिल्ह्यातील प्रत्येक शाळेतील पाचवी ते आठवीचा एक विद्यार्थी स्वच्छता मॉनिटर म्हणून काम आपल्या गावात करणार आहे. उत्तम कामगिरी करणार्या स्वच्छता मॉनिटर जिल्हास्तरावरून प्रमाणपत्र देऊन गौरव केली जाणार आहे.
मिशन स्वच्छ भारत या योजनेअंतर्गत महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने राज्यात सर्व शाळांमध्ये 2 ऑक्टोबर 2022 पासून लेट्स चेंज स्वच्छता मॉनिटर प्रकल्प सुरू झालेला आहे. प्रोजेक्ट लेट्स चेंज अंतर्गत स्वच्छता मॉनिटर अशी जबाबदारी स्वीकारण्यास विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याचा उपक्रम राबविला जात आहे. जिल्ह्यातही शिक्षणमंत्री यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत लेट्स चेंज स्वच्छता मॉनिटर प्रकल्प दिवाळीच्या सुट्यांमध्ये 10 नोव्हेंबरपर्यंत हा संकल्प करण्यात येत आहे.
यामध्ये विद्यार्थ्यांकडून साफ-सफाई करून घेणे किंवा रॅली काढणे, स्वच्छता विषयी निबंध/ चित्रकला स्पर्धा भरविण्याचा नसून केवळ निष्काळजीपणे कचर्याची विल्हेवाट लावणार्यांना इतरत्र कचरा टाकणार्यांना थांबवून त्यांची ती चूक त्यांच्या निदर्शनास आणून देतील. स्वच्छता मॉनिटरगिरी शाळेत किंवा घराजवळच नाही तर सर्वच ठिकाणी करणे विद्यार्थ्यांनी अपेक्षित आहे.
विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करा: कदम
जिल्ह्यातील बहुतांश शाळा या प्रकल्पाबाबत सक्रिय झालेल्या असून जिल्हास्तरावरून तसेच गटशिक्षणाधिकारी यांच्यामार्फतही या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याबाबत शाळांना सूचित करण्यात आले आहे. या उपक्रमाद्वारे आपले विद्यार्थी स्वच्छता मॉनिटर बनून कळत नकळत होणार्या कचर्याच्या बाबतीतल्या निष्काळजीपणाची असामाजिक सवय आटोक्यात आणण्यासाठी प्रत्येक शाळेतून जास्तीतजास्त विद्यार्थ्यांना स्वच्छता मॉनिटरिंग करण्यासाठी शाळांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. मच्छिंद्र कदम यांनी शाळांना केले