
येवला |प्रतिनिधी
पावसाळा संपलेला नाही तोच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला असून येवला तालुक्यात महिलांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. अशातच निमगाव मढ येथे गेल्या आठ ते दहा दिवसांपासून नळांना पाणी न आल्यामुळे येथील संतप्त महिलांनी कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायत कार्यालयात कोंडून घेतले व बाहेरुन एकावर एक असे दोन टाळे लावले.
अडवतीस गाव योजनेअंतर्गत गावात पाणीपुरवठा केला जात असताना येथे नळांना नियमित पाणी येत नाही त्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बँड व हंडे वाजवून तसेच मातीचे मटके फोडून त्रस्त महिला व नागरिकांनी आक्रमक होत ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढून ग्रामपंचायतचे पाणीपुरवठासह इतर ५ कर्मचारी व १ विद्यमान सदस्य यांना कार्यालयात कोंडले.
या मोर्चासंदर्भात आयोजकांनी येवला पंचायत समिती व संदर्भिय अधिकाऱ्यांना मोबाईल संदेशाद्वारे कळविले होते. परंतु याबाबत अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे ग्रामस्थांना नाईलाजाने मोर्चा काढणे भाग पडले.
यावेळी संबंधित ग्रामसेवक यांनीही रजा टाकलेली असल्याचे समजते. त्यामुळे दोन ते तीन तासानंतर कर्मचाऱ्यांनी ११२ आपत्कालीन क्रमांकाला फोन केला असता येवला ग्रामीण पोलीस घटनास्थळी पोहोचत त्यांनी दोन कुलपा तोडून कर्मचाऱ्यांना बाहेर काढले. सहाय्यक पोलीस निरिक्षक शिंदे यांच्यामार्फत उपमुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हापरिषद नाशिक व गटविकास अधिकारी पंचायत समिती येवला यांना दूरध्वनीवरुन कळविण्यात आले.
गटविकास अधिकारी प्रशिक्षणात असल्याने त्यांनी चिचोंडी येथील कार्यरत असलेले ग्रामसेवक व्यवहारे यांना निमगावमढ ग्रामपंचायतला जाऊन परिस्थिती हाताळण्यास सांगितले. व्यवहारे यांनी संबंधित योजनेतील कर्मचारी घुले यांच्याशी टाकीत पाणी सोडणेबाबत संपर्क साधला असता थकबाकी असलेली रक्कम जमा केली तर टाकी भरता येईल असे सांगितले. त्यामुळे आता ग्रामस्थांना प्यायला पाणी केव्हा मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.