
नाशिक । प्रतिनिधी Nashik
दर पावसाळ्यात धोकादायक ठरणार्या काझीगढीच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी मनपा प्रशासनाला द्रविडी प्राणायाम करावा लागत असतो. यावर तोडगा काढण्यासाठी काझीगढीला संरक्षक भिंत बांधण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्यात आला होता. मात्र त्यावर कार्यवाही होत नसल्याने पुन्हा एकदा तिसरे स्मरणपत्र पाठवण्यात आले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या व धोकादायक स्थिती नागरिक जीवन जगत असलेल्या काझीगढीच्या सुरक्षिततेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मनपाने राज्य शासनाच्या माध्यमातून हा प्रश्न मार्गी लावण्याचे साकडे घातले होते. जिल्हा आपत्कालीन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातूनही काझीगढीची संरक्षक भिंत बांधण्याचे काम राज्य पीडब्ल्यूडीमार्फत करण्यासाठी राज्य शासनाकडे पत्रव्यवहार करण्यात आला होता.
प्रत्यक्षात काझीगढीच्या संरक्षक भिंत उभारणीबाबत मनपा हस्तक्षेप करु शकत नाही. कारण ती खासगी जागा आहे. मात्र राज्यशासन आपातकालिन स्थितीच्या अनुषंगाने त्याठिकाणी काम करु शकत असल्याने मनपाने हा प्रस्ताव राज्य शासनाच्या आपतकालीन विभागाकडे वग्र केला होता. या विभागाने संरक्षक भिंत उभारण्यास होकारही दिला होता.
राज्य शासनाने या कामात होकार देत राज्य पीडब्ल्यूडीच्या माध्यमातून हे काम पूर्ण करण्याचा सूचना दिलेल्या होत्या. मात्र पीडब्ल्युडीच्या माध्यमातून याबाबत फारशी प्रगती झाल्याचे दिसून येत नसल्याने महानगरपालिकेने या संदर्भात मागील दीड वर्षात दोन स्मरणपत्र पाठवून या कामाला गती देण्याची मागणी केलेली होती. शुक्रवारी तिसरे स्मरणपत्र नगरविकासकडे पाठवण्यात आले आहे.