नाशिक । प्रतिनिधी Nashik
आजच्या युवा पिढीने झोकून देत काम करायला हवे. एखाद्या यशस्वी व्यक्तीला डोळ्यांसमोर ठेऊन प्रेरणा घेतली पाहिजे. नोकरी असो वा व्यवसाय; दोन्हीमध्ये पारंगत होऊन आपला ठसा उमटवला पाहिजे.
गाडीचे चाक थांबले की अर्थचक्र थांबते असे आपण नेहमी म्हणतो. व्यवसायात चढ-उतार चालूच राहतात. कधी फायदा होतो तर कधी तोटा! या सर्वांवर मात करून नाशकात म्हणून अशोका ट्रान्सपोर्ट ही प्रसिद्ध कंपनी नावारूपास आली आहे. या व्यवसायातून युवा उद्योजक आशिष सिंघल यांनी नाशकातील वाहतूक क्षेत्रात वेगळा ठसा उमटवला आहे.
1965 च्या सुमारास आशिष सिंघल यांच्या आजोबांनी अशोका ट्रान्सपोर्टची सुरुवात केली. 1989 च्या सुमारास आजोबांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन त्यांना उद्योगरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आशिष सिंघल यांचे प्राथमिक शिक्षण सिल्वर ओक स्कूलमधून तर पदवी शिक्षण बीवायके महाविद्यालयातून झाले आहे. आशिष यांना सुरुवातीपासूनच मार्केटिंग क्षेत्राची आवड होती. त्यामुळे अधिकाधिक मार्केटिंग क्षेत्राकडे कल होता. गेल्या चार वर्षांपासून नाशकातील अनेक ब्रॅण्ड्सचे मार्केटिंग करीत आहेत. ट्रान्सपोर्ट व्यवसायदेखील सांभाळत आहेत.
आजमितीस अशोका ट्रान्सपोर्ट कंपनी नाशिकसह देशातील 15 ते 20 ठिकाणी कार्यरत आहे. ट्रकचालक म्हटले की, समाजात एक वेगळी भावना निर्माण होते. परंतु अर्थचक्र हाकणार्या या घटकास वाहतूक व्यवसायात अनन्यसाधारण महत्व आहे. आपणही त्यांना खर्या अर्थाने आदराचे स्थान दिले पाहिजे. करोना काळात सगळे काही बंद होते, पण एक गोष्ट सात्यत्याने आपल्या कार्यात मग्न होती; ती म्हणजे वाहतूक व्यवस्था! सगळे बंद असूनही वाहतूक व्यवस्था चालू होती.
भाजीपाला, औषधे, जीवनावश्यक वस्तू व इतर साहित्याची वाहतूक मोठ्या प्रमाणावर करण्यात आली. अडकलेल्या प्रवाशांनाही सुखरूप पोहचवण्याचे कार्य वाहतूक व्यवस्थेने केले. त्यामुळे कुठल्याही डिजिटल प्लॅटफॉर्म वर न राहता कामात सातत्य ठेऊन वाहतूक व्यवस्था सुरळीत सुरु होती. आजही वाहतूक व्यवस्था थांबली तर जग थांबते. त्यामुळे मानवी जीवनात वाहतुकीचे स्थान महत्वपूर्ण आहे.