सिन्नर । प्रतिनिधी Sinnar
तालुक्यातील बारागाव पिंप्री ( Baragaon Pimpri Grampanchayat )येथे ग्रामपंचायतने गाव परिसरात पक्षांच्या दाणा-पाण्याची सोय (Feeding and watering to birds ) केली असून असा उपक्रम राबवणारी बा. पिंप्री ग्रामपंचायत राज्यातील पहिली ग्रामपंचायत बनली आहे.
गावात अखंड हरीनाम सप्ताहात चैतन्य महाराज वाडेकर यांनी पक्षांसाठी धान्य देण्याचे महत्व पटवून दिले व प्रत्येकाने थोडे-थोडे धान्य आणण्याचे आवाहन केले. काल्याच्या दिवशी अक्रूर महाराज साखरे यांनी आपल्या कीर्तनातही पशु -पक्षाची सेवा ही ईश्वर सेवा असल्याचे सांगितले. त्यानुसार ग्रामपंचायतने पूढाकार घेत हा उपक्रम राबवला असून असा उपक्रम राबवणारी पिंप्री ग्रामपंचायत महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.
या उपक्रमाचे उद्घाटन चैतन्य महाराज, माजी आमदार राजाभाऊ वाजे, अक्रूर महाराज यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. सरपंच संध्या विजय कटके व उपसरपंच योगेश गोराडे यांनी यासाठी पुढाकार घेत ‘एक पाऊल निसर्ग संवर्धनाकडे, एक पाऊल पशु पक्षांसाठी’ हा उपक्रम राबवला.
या अंतर्गत पक्षांसाठी धान्य व पाण्याची सोय गावात करण्यात आली आहे. कटके यांनी आपल्या मानधनातून 1 हजार लिटर पाण्याची टाकी, सदस्य शिला उगले व अनिल उगले यांनी स्व:खर्चाने वॉश बेसीन दिले. मनीषा उगले, अविनाश कळंबे यांनी पाण्याचे भांडे दिले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.