
नाशिक । प्रतिनिधी | Nashik
सह्याद्री फार्मर्स (Sahyadri Farmers) तर्फे दि.23 पासून विनियार्ड अल्ट्रा मॅरॅथॉनचे (Vineyard Ultra Marathon) आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (दि.26) सकाळी 6 वाजता या उपक्रमाचा शुभारंभ ‘सह्याद्री फार्म्स‘, मोहाडी (Sahyadri Farms, Mohadi) येथून होणार आहे.
सह्याद्री रन (Sahyadri Run) ही अल्ट्रा मॅरॅथॉन (Ultra Marathon) महाराष्ट्रात प्रथमच मोठ्या प्रमाणावर आयोजित करण्यात आली आहे. 5 किलोमीटर पासून ते 338 किलोमीटर पर्यंतचे वेगवेगळे टप्पे ठरविण्यात आले आहेत. सह्याद्री फार्म्स (Sahyadri Farms) आणि ब्ल्यू ब्रिगेड (Blue Brigade) यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या मॅरॅथॉन मध्ये 23 ते 26 या कालावधीत अल्ट्रा रनर्स 50,100 ते 338 किलोमीटर पर्यंतचे अंतर वेगवेगळ्या टप्प्यात पार करतील.
नियमित स्वरुपाची मॅरॅथॉन ही रविवारी (ता.26)सकाळी 6 वाजता सुरु होईल. त्यामध्ये 5 किमी, 10, किमी,21 किमी आणि 42 किमी हे महत्वाचे टप्पे आहेत. या प्रत्येक टप्प्यात स्पर्धकांना बक्षिसे जिंकण्याची संधी आहे. यात स्पर्धकांना 1 टी- शर्ट, डिकॅथलॉनची बॅग, फळांचे रस, प्रमाणपत्र आणि पदक मिळणार आहे. धावण्याबरोबरच झुंबा सारख्या अन्य व्यायामप्रकारांचाही यात समावेश असेल. या स्पर्धेसाठी नाममात्र प्रवेश शुल्क असेल.
धकाधकीच्या रोजच्या जीवनात सर्वांचे स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असतांना प्रत्येकाने फिटनेसबाबत जागरुक व्हावे हा संदेश देण्यासाठी या मॅरॅथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. या मॅरॅथॉनमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा. असे आवाहन करण्यात आले आहे. ‘सह्याद्री’च्या शेतकऱ्यांच्या (farmers) पुढाकारातून त्यांच्याच शिवारातून होत असलेली मॅरॅथॉन हे या मॅरॅथॉनचे वैशिष्ट्य आहे.
या मॅरॅथॉनच्या आयोजनात ‘सह्याद्री फार्म्स‘ या शेतकऱ्यांच्या कंपनीला ब्लू ब्रिगेड या प्रथितयश धावपटूंच्या ग्रुपची साथ लाभली आहे. विनियार्ड अल्ट्रा ही विशेष संकल्पना या मॅरॅथॉनच्या आयोजनात आहे. ही मॅरॅथॉन डांबरी सडकेवर आणि शहरातच न होता प्रथमच शेतशिवारातून होणार आहे. द्राक्षपिकांच्या बांधाबांधाने, सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून, पालखेड धरणाच्या (palkhed dam) जवळून धावणे होणार आहे.
आरोग्य संवर्धनाचा संकल्प मनात असणाऱ्या सर्वांसाठी ही मॅरॅथॉन म्हणजे सुवर्णसंधी असणार आहे. तरी या मॅरेथॉन साठी इच्छुक स्पर्धकांनी संकेत झांबरे यांच्याशी ७०३०९६२८७१ या क्रमांकावर संपर्क साधावा अथवा सह्याद्री फार्म्स च्या संकेत स्थळावर नोंदणी करावी. द्राक्ष निर्यातीत देशात आघाडीवर असलेल्या सह्याद्री फार्म्समार्फत सामाजिक हिताच्या दृष्टीने अनेक उपक्रम राबविले जात आहे. शेतीमध्ये ‘सकारात्मकता वाढीस लागावी यासाठी ‘कर्ता शेतकरी‘ हा विशेष उपक्रमही राबविण्यात येत आहे.
‘‘सशक्त शरीरात सशक्त मन असते. या म्हणी प्रमाणे आपल्या प्रत्येकाने शारिरीक आरोग्याचीही योग्य पध्दतीने काळजी घेतली पाहिजे. ही मुख्य भूमिका या उपक्रमामागे आहे. याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा.‘‘
-विलास शिंदे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी, मोहाडी.