नाशिकमधील गावांना जायचंय गुजरातमध्ये; जाणून घ्या कारण
सुरगाणा | प्रतिनिधी | Surgana
देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष उलटूनही सुरगाणा तालुक्यातील अनेक गाव व पाडे सुख सुविधांपासून वंचितच आहेत. ग्रामीण भागातील गावांचा विकास करता येत नसेल तर ही सर्व गावे गुजरातमध्ये विलिन करा, अशी मागणी तहसीलदर सचिन मुळीक यांना देण्यात आलेल्या लेखी निवेदनाद्वारे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चिंतामण गावित यांनी गावकऱ्यांसह केली आहे...
महाराष्ट्र व कर्नाटक राज्याच्या सीमावर्ती भागातील गावांची चर्चा सुरू असतानाच आता सुरगाणा तालुक्याच्या सीमावर्ती भागातील गावे गुजरातमध्ये सामील करण्याची मागणी पुढे आली आहे. गुजरात राज्यातील व गुजरातच्या सीमावर्ती भागात आणि महाराष्ट्रातील सीमावर्ती भागात मिळणाऱ्या सुखसुविधांमध्ये व विकासकामांमध्ये जमीन आसमानचा फरक आहे.
गुजरातमधील सीमावर्ती भागातील रस्ते, आरोग्य सेवा, पाणी, दळणवळण, वीजपुरवठा आदी नागरिकांना मिळणाऱ्या सुविधा सुस्थितीत आहेत. तर सुरगाणा तालुक्यातील रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली असून गेल्या काही वर्षांत वीजपुरवठा मिळालेला नाही.
दरवर्षी पाणी टंचाई निर्माण होते. सिंचन प्रकल्प नाही. त्यामुळे शेती व्यवसायात पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. गेल्या काही वर्षांपासून मजूरीसाठी होणारे स्थलांतर अद्याप थांबलेले नाही. अर्थात जो सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे होता तो विकास मागील काही वर्षात झाला नाही. समस्या सुटत नसल्याने आणि आपल्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी गावकऱ्यांनी गावचा समावेश गुजरातमध्ये करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.