नाशिक | प्रतिनिधी | Nashik
गेल्या काही दिवसांपासून राज्यात जोरदार पाऊस (Rain) बरसत आहे. यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. सुमारे २ लाख ३३ हजार ८९७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे भाज्यांच्या घाऊक दरात वाढ झाली आहे...
नाशिकमध्ये पावसामुळे भाजीपाल्याची (vegetables) आवक जवळपास निम्याने कमी झाली आहे. ग्रामीण भागातून नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत (Nashik APMC) भाजीपाल्याची आवक होते.
गेल्या काही दिवसात नाशिक बाजारातील आवक सुमारे ६० ते ७० टक्क्यांनी कमी झाल्याचे समजते. परिस्थिती अशीच कायम राहिली तर भाज्यांचे दर (Vegetables Price) आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
नाशिक व इतर बाजारातून मुंबई-ठाण्याला येणाऱ्या भाज्यांत ४० टक्क्यांची घट झाली आहे. नाशिकमधून दररोज सुमारे २०० वाहने भाजीपाला घेऊन नवी मुंबईच्या वाशी बाजारासह कल्याण, ठाणे आणि मुंबईच्या उपनगरांमध्ये जातात.
पूर्वी चार तासात वाशी बाजारात पोहोचणाऱ्या वाहनाला सध्या नाशिक-मुंबई महामार्गावरील (Nashik-Mumbai Highway) खड्डे, भिवंडी, ठाण्यातील वाहतूक कोंडीने सहा ते सात तास लागत आहे. यामुळे मुंबईच्या दैनंदिन भाजीपाला पुरवठय़ावर विपरीत परिणाम झाल्याचे चित्र आहे.