घोटी । जाकीर शेख
इगतपुरी तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून अवकाळी पाऊस व गारपीट होत असल्याने बहुतांश ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाली काल तालुक्यात पावसाने पाठ फिरवली असली तरी आज पुन्हा चौथ्या दिवशीही तालुक्याला पावसाने चांगलेच झोडपले त्यात पूर्व भागात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली.
या गारपीट व अवकाळी पावसाने तालुक्यात भाजीपाला व बागायती पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी हतबल ठरले आहेत गारपीट मुळे भाजीपाला पिके व रोपे उध्वस्त झाल्याचे चित्र शेतकऱ्यांना डोळ्यासमोर पाहावे लागले. गेल्या चार दिवसांपासून होत असलेला अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे शासनाने तात्काळ दखल घेऊन नुकसानीचे पंचनामे करून संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी शेतकरी वर्गातून करण्यात आली आहे.
आज चौथ्या दिवशी इगतपुरी तालुक्यातील वाडीव-हे, गोंदे, पाडळी तसेच धामणगाव बेलगाव,धामणी या पूर्व भागातील शिवारात मोठया प्रमाणात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली तर पश्चिम पट्यात घोटी इगतपुरीला जोराच्या अवकाळी पावसाने चांगलेच झोडपले. या पावसामुळे दुचाकीवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली.
इगतपुरी तालुक्यात पूर्व भागात वाडीव-हे, गोंदे, पाडळी, धामणगाव, धामणी बेलगांव तऱ्हांळे परिसरात आज पुन्हां सलग चौथ्या दिवशी विजेचा कडकडाट, अन वादळी वारा सह जोरदार पाऊस पडला. या अवकाळी व गारपीट मुळे शेतकरी बांधव चिंताग्रस्त झाला आहे.सरकार लक्ष देईना करोनाचे संकट जाईना, अन निसर्ग जगू देईना अशा स्थितीत शेतकरी भरडला गेला आहे.
पांडुरंग वारुंगसे - माजी संचालक ,घोटी बाजार समिती